महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळातर्फे  सरकार दरबारी मांडण्यात आलेल्या मागण्या १२ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण झाल्या नाही तर १३ फेबुवारीपासून ‘काम बंद’ आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाचा फटका बारावीच्या परीक्षांना बसणार आहे.
कनिष्ठ महाविद्यालयापुढील ‘कायम विनाअनुदानित’ हा शब्द शासनाने अद्याप काढलेला नाही. याचबरोबर विनाअनुदानित शाळांचे विविध प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. यासाठी नुकतेच शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या बाहेर शांततामय आंदोलन करण्यात आले. त्यावेळी निवेदन सादर करून १२ फेब्रुवारीपर्यंत मागण्या मान्य केल्या नाही तर नाईलाजाने कामबंद आंदोलन करावे लागेल, असे महसमंडळाचे प्रवक्ते प्रशांत रेडीज यांनी स्पष्ट केले. शिक्षकांना केंद्राप्रमाणे सहावा वेतन आयोग लागू करणे, वर्गात जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या २५ असावी तसेच शिक्षक विद्यार्थी तुकडी संख्येचा नवा अध्यादेश रद्द करावा, शालेय पोषण आहार योजना त्रयस्थ यंत्रणेकडे द्यावी आदी महामंडळाच्या प्रमुख मागण्या आहेत.