शिक्षणाधिकारी पदासाठी दीड वर्षांपूर्वी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल अखेर ‘महाराष्ट्र लोक सेवा आयोगा’ने (एमपीएससी) जाहीर केला असून त्यामुळे राज्यभरातील तब्बल ७१ शिक्षण अधिकाऱ्यांच्या भरतीचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
एमपीएससीने सुमारे आठ वर्षांनी १७जुलै, २०११ला शिक्षणाधिकाऱ्यांच्या ७४ पदासाठी ही लेखी परीक्षा घेतली होती. लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्या २७० उमेदवारांच्या एमपीएससीने मुलाखतीही घेतल्या. मात्र, पुढे ही परीक्षा न्यायालयीन वादात अडकल्याने त्याचा निकाल दीड वर्षे रखडला होता. शिक्षणाधिकाऱ्यांची ही पदे एमपीएससीमार्फत सरळसेवा भरतीने भरणे आवश्यक होते. पण, निकाल रखडल्याने दरम्यानच्या काळात पदोन्नतीने या पदांवर आपली वर्णी लावण्याचा प्रयत्न शालेय शिक्षण विभागातील जुन्या अधिकाऱ्यांनी सुरू केला.
या परीक्षेसंदर्भातील न्यायालयीन वाद संपुष्टात आल्याने १६ फेब्रुवारीला एमपीएससीने अखेर ७४पैकी ७१ पदांचा निकाल जाहीर केला आहे.  त्यामुळे, शिक्षणाधिकाऱ्यांच्या थेट भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. उर्वरित तीन पदांचा निकाल काही तांत्रिक व कायदेशीर कारणांमुळे जाहीर करता आलेला नाही.