पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला़  या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचेही एखाद्या शिक्षकाप्रमाणेच निरसन केल़े
*पंतप्रधान म्हणून अनुभव काय?
मोदी – दिल्ली पाहण्यास आपल्याला वेळ मिळत नाही, कार्यालयातून घरी आणि घरातून कार्यालयात असाच दिनक्रम असतो. पण मुख्यमंत्री म्हणून मिळालेल्या अनुभवाचा फायदा मिळाला. आपल्या अनुभवाइतकेच शिक्षण, शिक्षक आणि मूल्ये महत्त्वाची आहेत.
*आपण पंतप्रधान व्हाल आणि जगप्रसिद्ध व्हाल असे बालपणी वाटले होते का?
मोदी – आपण स्वप्न जरूर पाहावी मात्र कोणीतरी होण्याची स्वप्न पाहू नयेत तर काहीतरी करण्याची स्वप्न पाहावी. पंतप्रधान होऊ असे बालपणी कधीही वाटले नव्हते. शाळेत असताना वर्गप्रमुखाची निवडणूकही लढविली नव्हती.
*विद्यार्थ्यांशी संवाद साधून तुम्हाला काय मिळणार?
मोदी – काही गोष्टी अशा असतात की त्या बदल्यात आपल्याला काय मिळेल याचा विचार करावयाचा नसतो. आपल्याला काही मिळवायचे असते तर आपण आलोच नसतो.
*आपण पंतप्रधान कसे झालात?
मोदी- २०२४च्या निवडणुकीची तयारी करा आणि आपल्या शपथविधी समारंभाला आपल्याला निमंत्रित करा, याचा अर्थ तोपर्यंत आपल्याला काळजीचे कारण
नाही.
*जपानमध्ये आपण काही शाळांना भेटी दिल्या, आपल्या आणि त्यांच्या शाळांमध्ये कोणता फरक जाणवला?
मोदी- जपानमध्ये शिकण्याची प्रवृत्ती आहे, शिकविण्याची नाही.जपानमध्ये शिक्षणाला महत्त्व आहे.
*देशाच्या विकासात आम्ही कसे सहभागी होऊ शकतो?
मोदी- तुम्ही सर्वांनी उत्तम विद्यार्थी बना, तोच उत्तम सहभाग असेल. मोठी कामगिरी करणे म्हणजेच देशासाठी काहीतरी केले असे नव्हे तर छोटय़ा गोष्टींमधूनही तुम्ही देशासाठी मोठे कार्य करू शकता.
मोदी उवाच
*आपल्यातील बालपण सदैव जपले पाहिजे कारण तेच आपल्याला सदैव ‘जिवंत’ ठेवते.
*विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे.
*समाजात शिक्षकांचे महत्त्व किती आहे ते अधोरेखित करण्याची गरज आहे.
*हुशार विद्यार्थ्यांना शिक्षक होण्याची इच्छा का नसते या मुद्दय़ावर व्यापक चर्चेची गरज आहे.
*एकेकाळी शिक्षक हा छोटय़ा गावातील प्रतिष्ठित व्यक्ती होती.
*शिक्षकांचा योग्य सन्मान राखला जाणार नाही तोपर्यंत बदल घडविणे कठीण आहे.
*डॉ. राधाकृष्णन यांनी स्वत:चा वाढदिवस साजरा केला नाही, त्यांनी शिक्षकांसाठी दिवस साजरा केला.
*शिक्षक हे विद्यार्थ्यांचे हीरो आहेत, काही विद्यार्थी आपल्या शिक्षकांसारखा पेहराव करतात, या उत्साहाला प्रोत्साहन दिले पाहिजे.
*विद्यार्थिनींसाठी सर्व शाळांमध्ये स्वतंत्र शौचालये असणे गरजेचे आहे. शौचालये बांधण्यासाठी शिक्षकांची मदत गरजेची आहे.
*जपानमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी शौचालये साफ करतात, आपण का करीत नाही.
*समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी शाळेत वर्ग घ्यावा.
*तंत्रज्ञानाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे आपल्या मुलांना त्यापासून वंचित ठेवता येणार नाही. तसे केल्यास तो सामाजिक गुन्हा ठरेल.
*शारीरिक तंदुरुस्तीही तितकीच महत्त्वाची आहे,दूरदर्शन आणि संगणक यापलीकडेही जग आहे, तुम्ही सक्रिय असले पाहिजे.
*अभ्यासक्रमाविना किती जणांना अवांतर वाचन करणे आवडते.
*आयुष्यात सफलता मिळविलेल्या व्यक्तींबाबतची माहिती वाचावयास हवी.
*विद्यार्थ्यांनी आत्मचरित्रांचे वाचन करावयास हवे त्यामुळे तुम्ही इतिहासाच्या जवळ जाता आणि सत्य जाणण्याची आपली क्षमता वाढते.