टोलवरून राजकारण चांगलेच तापलेले असताना ‘स्कूल बस ओनर्स असोसिएश’नेसुद्धा  (सोबा) टोलमाफीची मागणी केली आहे. राज्य सरकारच्या नवीन धोरणात स्कूल बसेसना टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी ‘सोबा’तर्फे करण्यात आली आहे.
नवीन टोल धोरणात स्कूल बसना टोलमाफी देण्यात यावी, असा आमचे म्हणणे असून त्यासाठी आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन देणार असल्याची माहिती गुरुवारी असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली. मुंबई – ठाण्यात अनेक शाळा महामार्गाजवळ असून या स्कूलबसना टोलनाक्यावरून प्रवास करावा लागतो. मिरा रोडमधील विद्यार्थी दहिसरच्या शाळेत असतील, तर दहिसर टोलनाक्यावरून बसला जावे लागते. अशाच पद्घतीनेमुलुंड, वाशी आणि आरे या टोलनाक्यावर स्कूलबसची ये-जा सुरू असते. प्रत्येक बस शाळेच्या सत्रांनुसार सहा वेळा टोलनाका ओलांडते. दर वेळी टोल भरावा लागतो, असे गर्ग म्हणाले.