महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांना पदवी प्रवेश (एमबीबीएस) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी दोन आठवडय़ांची मुदत दिली आहे. ही मुदत ३० सप्टेंबरला संपली होती. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने भारतीय वैद्यक परिषदेची याचिका फेटाळून लावली.
काही वैद्यकीय महाविद्यालयांनी आपल्या जागा वाढवल्या मात्र त्या जागांवर प्रवेश देण्यास वैद्यक परिषद नकार देत होती.  नियमानुसार वैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेला दहा वर्षे पूर्ण झाल्यावर अधिक जागा निर्माण करता येतात. मात्र नागपूर येथील इंदिरा गांधी सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि अकोला येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाला १० वर्षे पूर्ण व्हायला काही दिवस कमी पडत होते.  या कारणावरून दोन वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अधिक जागा भरण्यास भारतीय वैद्यक परिषदेने परवानगी नाकारली होती. मुंबई उच्च न्यायालयाने या दोन्ही महाविद्यालयांना अतिरिक्त जागा भरण्यास परवानगी दिली होती. त्याला वैद्यक परिषदेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.  ही याचिका फेटाळत न्यायालयाने महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांना या दोन महाविद्यालयांमध्ये नव्याने निर्माण झालेल्या १०० जागा पाहता प्रवेश प्रक्रिया १४ ऑक्टोबपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.