7मुलांच्या अभ्यासाच्या अथवा करिअरच्या विविध टप्प्यांवर पालकांची साथसोबत अत्यंत आवश्यक असते. या पाक्षिक सदरातून मुलांच्या वेगवेगळ्या शैक्षणिक टप्प्यांदरम्यान पालकांची भूमिका काय असावी, हे जाणून घेणार आहोत-

गेल्या दोनएक दशकात पालकत्वाच्या, शिक्षणाच्या संदर्भात ‘मुलांना समजून घेणं’ याबद्दल खूप बोललं जातंय. मुलाला समजून घेणं, म्हणजे काय तर त्याच्या मर्यादा, क्षमता, कल आणि ते ज्या वातावरणातून आलं आहे, त्याबद्दलचं भान असणं. पण पालक आणि शिक्षक म्हणून या सगळ्याचं पुढे काय करायचं, असा प्रश्न आपल्यापकी अनेकांना भेडसावत असतो. रोजच्या जगण्यातल्या, शाळेच्या अभ्यासातल्या काही गोष्टी मुलांना करता येण्याला काही पर्याय नसतो. ज्यांना त्या अगदीच जमत नाहीत, अशांच्या गळी त्या उतरवताना मात्र ‘पुढे काय?’ हा प्रश्न फारच भेडसावायला लागतो. १५वर्षांपूर्वी मी एका अमेरिकन प्रीस्कूलमध्ये काम करायला सुरुवात केली, तेव्हा हे वास्तव रोजच समोर उभं ठाकायला लागलं. आमची ही शाळा होती एका युनिव्हर्सटिी टाऊनमध्ये. इथे मुलांच्या भाषा, देश, वंश, धर्म सगळ्यांतच खूप विविधता होती. अगदी मुलांच्या आईबाबांच्या वयाच्या रेंजमध्येही- १७-१८ ते अगदी चाळिशीपापर्यंत. त्यातून अनेक आईबाबा स्वत: युनिव्हर्सटिीत शिकणारे विद्यार्थी होते. त्यामुळे अभ्यास, नोकरी, घर, मुलं यात त्यांची कायमच अवस्था ‘रात्र थोडी सोंगे फार’ अशी असायची. सगळ्या आघाडय़ांना ‘टाइम मॅनेजमेंट’च्या साच्यात बसवताना, मुलांचं संगोपनही नकळत त्याच साच्यात बसवायचा प्रयत्न व्हायचा. त्यांना मुलांच्या सगळ्या प्रश्नांवर फटाफट सोल्युशन्स हवी असायची. गेल्या दशकभरात महाराष्ट्रातल्या लहान-मोठय़ा शहरांतही हेच चित्र कमी-अधिक फरकाने दिसतं आहे. या प्रीस्कूलमध्ये माझ्याकडे एक फार इंटरेिस्टग काम होतं, मुलांना न जमणाऱ्या रोजच्या व्यवहारातल्या गोष्टी, लेखनपूर्व-वाचनपूर्व कौशल्याचे पलू या सगळ्यासाठी काही उपाययोजना करायच्या. अनेकदा त्या प्रत्येक मुलासाठी वेगवेगळ्या असायच्या. त्यामुळे अनेक आई-बाबा आमच्या मुलाला अमुक तमुक गोष्टी जमत नाहीत, अशी यादी घेऊन माझ्याकडे यायचे. त्यात ‘जमेल ना त्याला हे?’, अशी खूप काळजी करणारे काही असायचे, तर ‘तुम्हाला आता प्रॉब्लेम्स दिले आहेत, तर कधीपर्यंत आमच्या मुलाला आता दुरुस्त करून देता?’, अशा सुरात बोलणारेही काही असायचे. एकदा एकीने सांगितलं, ‘माझ्याकडे अजिबात पेशन्स नाहीत,
तेवढं तू शिकव माझ्या मुलीला. बाकी सगळं मी मॅनेज करू शकेन.’या सगळ्याने सुरुवातीला मी फार वैतागायचे. भारतात परत आले, तेव्हा या प्रकारच्या कमी-अधिक आवृत्ती सगळीकडे दिसायला लागल्या होत्या. हळूहळू मात्र या सगळ्या गोष्टींमागचं त्या आईबाबांचं हताशपण, अपराधीपण समजायला लागलं. जोडीला स्वत:चं मूल वाढवताना पडणारे असंख्य प्रश्नही होतेच. आईबाबांच्या भूमिकेत आपण किती अपुऱ्या तयारीनिशी उतरतो, हे जाणवायला सुरुवात झाली होती. आज एक किंवा दोन मुलांचे आईबाबा, आपापले व्यवसाय सांभाळून मुलांसाठी जे जे शक्य ते करताना दिसतात. त्यात उत्तम शिक्षण, खेळ-अॅक्टिव्हिटीजना एक्स्पोजर, घरातल्या सोयीसुविधा, आíथक तरतुदी अशा अनेक बाबी त्यात आहेत. तरीही हे सगळं पुरेसं आहे ना, आपण पालक म्हणून कुठे कमी तर नाही ना पडत, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहेच. पिढीजात शहाणपण म्हणून आई-आजींनी त्यांच्या अनुभवातून सांगितलेल्या चार गोष्टी आजच्या पालकांना अपुऱ्या, असमाधानकारक वाटताहेत. त्यातून बदलत्या काळाने उभे केलेले मुलांचे प्रश्न समजून घ्यायलाच आपल्याला वेळ लागतो आहे, त्यांची उत्तरं मिळवणं हा तर त्याच्या पुढचा भाग. अशा वेळी कुठून तरी मार्ग दिसावा, काही जळमटं झटकली जावीत, काही तरी बळ मिळावं, आनंदाचे आणि खिन्नतेचेही क्षण शेअर करता यावेत, असं आपल्या सगळ्यांच्याच मनात येऊन जातं. पालकशाळांची निकड वाटते ती यासाठीच.माझा मुलगा अगदी लहान असताना मी एका पालकशाळेला जायचे. साठीपल्याडची आमची ट्रेनर पहिल्याच दिवशी म्हणाली होती, ‘आईबाबा होणं, हा अनुभव जितका छान असू शकतो ना, तितकाच तो झोप उडवणाराही (हॉिण्टग) असू शकतो,’ गेली अनेक र्वष मुलं, पालक आणि शिक्षक या तिन्ही आघाडय़ांबरोबर काम करताना तिचं हे वाक्य माझ्यात कायम जागं आहे. मातृत्व-पितृत्वाच्या नसíगक प्रेरणेतली प्रचंड ताकद तर रोजच दिसते आहे, कधी त्यातून काही फार छान घडतं, तर कधी अगदी नकोनकोसं.‘समज-उमज’मधून हेच तर सगळं आपल्याबरोबर शेअर करायचं आहे.