खाण्यावर प्रेम करणारी, भरभरून खाणारी आणि खिलवणारी, आणि स्वत:ही स्वयंपाकघरात रमणारी अनेक मंडळी शेफ विष्णू मनोहर यांना भेटली ती खाद्यक्षेत्रात मुशाफिरी करताना. त्यातल्याच सुरेश भट, राम शेवाळकर, महेश एलकुंचवार, मधु कांबीकर, कविता लाड, अमोल कोल्हे, नितीन गडकरी आणि लालूप्रसाद यादव यांच्या खाद्यप्रेमाचे किस्से त्यांच्याच शब्दांत.

गेली कित्येक वर्षे मी खाद्यक्षेत्रात मुशाफिरी करतो आहे. अनेक पदार्थ करत असताना, त्यातून नवीन काही शिकत गेलो आणि त्यातूनच खूप काही मिळतही गेलं. त्यातलंच एक म्हणजे अनेक माणसांचं प्रेम, सहवास! माणसं आपल्याला समृद्ध करतात तेच मलाही अनुभवायला मिळालं. खाण्याच्या आवडीबद्दल विचार केला तर मला असा अनुभव आलाय की एखादा माणूस त्याच्या क्षेत्रात कितीही उच्च स्तरावर गेला असला आणि ते ठिकाण गाठण्यासाठी त्याने कितीही तडजोडी केल्या तरी ही मंडळी खाण्याच्या बाबतीत मात्र सहसा तडजोड करताना दिसत नाहीत. मला भेटलेल्यांमध्ये काही कालाकर, साहित्यिक व नेते मंडळीही होती ज्यांचं खाण्यावर मनापासून प्रेम होतं. सुरेश भट, राम शेवाळकर, महेश एलकुंचवार,

मधु कांबीकर, कविता लाड, अमोल कोल्हे आणि राजकीय क्षेत्रातले नितीन गडकरी, लालू प्रसाद यादव याचं खाद्यप्रेम मी अनुभवलं आहे.

खाद्यशौकीन कवी सुरेश भट यांचा अगदी लहान, नकळत्या वयातच माझा संबंध आला तो बाबांमुळे. ते आमच्याकडे त्यांची लुना घेऊन यायचे, त्यांचा एक पाय अधू होता, त्या अधू पायावर जोर देऊन वर बघत ते जोरानं हाळी देत, ‘‘अरे मनोहर, मी येतोय. वहिनींना सांग मटारभात करायला.’’ आजही त्याचं हे वाक्य जसंच्या तसं कानात घुमतंय. त्यांना आईच्या हातचा मटारभात अतिशय आवडे. तसंही ते खाण्याचे प्रचंड शौकीन, त्यांच्या खाण्याचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. आमचे बाबा चित्र काढत असत आणि ते शेजारी बसून कविता ऐकवत असत. हे तर आमच्या घरातलं एकादिवसाआडचं दृश्य होतं म्हटलं तरी हरकत नाही. ते आणि बाबा अनेकदा चित्रपट बघायला जायचे एकत्र. तेव्हा ते तीन सीट बुक करायचे. दोन सीट त्यांच्यासाठी आणि मधली सीट त्यांचं खाण्यापिण्याचं सामान ठेवण्यासाठी! त्यांची चित्रपटाची तिकिटं काढून आणणं, त्यांच्या खाण्याच्या पिशव्या घेऊन त्यांना थिएटपर्यंत सोडणं ही कामं आम्हीही आनंदाने केली आहेत.

आम्ही एकदा त्यांच्या अमरावतीच्या घरी गेलो होतो. आमच्याबरोबर मी भरपूर खाण्याचे जिन्नस घेतले होते. त्यांनी कविता ऐकवल्या, मग मी म्हटलं, ‘‘आता मी गातो.’’ माझं गाणं झाल्यावर ते म्हणाले होते, ‘‘विष्णू, तुम्हे कोई कहे या ना कहे हम तो पंडित कहेंगे..’ त्यांच्या या बोलण्यानं मी खूश होणार तोच त्यांनी मला जमिनीवरही आणलं. ‘इतना खूश होने की जरुरत नही है, पंडित गाने के लिये नही बल्की तुमने जो खिलाया उसके लिये है!’’ तेव्हा मी त्यांना त्यांच्या आवडीचा चिकनचा चिवडा खायला घातला होता. आज ते नाहीत पण त्यांचा माझ्यावर कायमच प्रभाव राहिला. इतका की, त्यांच्या ‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते’ या कवितेचं डाळींचे भाव अचानक प्रचंड वाढले तेव्हा मी विडंबन केलं होतं.. ‘पिठल्याने केली सुटका, वरणाने छळले होते. इतकेच मला खाताना पानावर कळले होते!’

पुढे मात्र ते पुण्यात जास्त काळ राहू लागल्यावर आमचा संपर्क कमी झाला. पण त्याचबरोबर आणखी एका मोठय़ा साहित्यिकाची जवळून ओळख व्हायला सुरुवात झाली ते म्हणजे

रामभाऊ शेवाळकर अर्थात भाऊसाहेब शेवाळकर, मी त्यांना काका म्हणायचो. माझ्या पहिल्या पुस्तकांच्या प्रकाशनाच्या वेळी मला त्यांचा जवळून परिचय झाला. माझ्या ‘सिक्रेटस् ऑफ इंडियन ग्रेव्ही’ या पुस्तकाचे प्रकाशन भाऊकाकांनी केलं होतं. त्यावेळी मला प्रकर्षांने जाणवलं की पुस्तकं लिहायच्या आधी त्यांना भेटायला पाहिजे होतं. कारण खाण्याच्या संस्कृतीविषयीची इतकी वेगवेगळी माहिती मला त्यांच्याकडून मिळाली की तिचा उपयोग पुस्तकासाठी नक्कीच झाला असता. पण यातूनही एक चांगली गोष्ट घडली ती ही की, सगळी माहिती लिहिण्यासाठी मी दुसरं पुस्तक लिहायला सुरुवात केली.

भाऊकाकांच्या खाण्याच्या शौकाचे वर्णन झणझणीत, चमचमीत असे करता येईल. वऱ्हाडचे असल्यामुळे पदार्थावर कच्चं तेल घेण्याची त्यांची सवय आणि तिखट तर ऐवढं खायचे की मिरचीसुद्धा त्यांना घाबरायची, असं काकू सांगत. पण नंतर मात्र ते सर्व पथ्यामुळे बंद झालं होतं. मात्र त्यांच्या तिखटाच्या तरीबाज आठवणी अजूनही डोळ्यांत तरळतात..

हिरव्या मिरच्यांचा ठेचा तर भाऊकाका भाजी सारखे खायचे. खेडेगावातल्या एस.टी. स्टँडसमोरचे तरीबाज तिखट वडे आणि अमरावतीचं गंडय़ातलं हॉटेल ही त्यांची आवडती ठिकाणं. ‘मरण सोसावे परी पहिले चुंबन घ्यावे.’ या काव्यपंक्तीच्या धर्तीवर भाऊकाका गंडय़ातल्या हॉटेलचं वर्णन करताना म्हणत, ‘मरण सोसावे परी आयुष्यात एकदा गंडय़ात जावे.’ असं चमचमीत खाणं खाणारे भाऊकाका नंतर मात्र फार संयमी झाले होते. म्हणजे त्यांच्यासमोर कोणी गरमागरम वडा व तरीबाज मिसळ खात बसले तरी त्यांच्या तोंडाला पाणी सुटत नसे की चेहऱ्यावरील रेषसुद्धा हलत नसे.

लग्नात जेवायला बसताना भाऊकाका पहिल्या पंगतीत पहिल्या किंवा दुसऱ्या जागेवर बसायचे. याचं कारण ते सांगत की, पहिलं वाढणं असल्यामुळे भाजीबरोबर योग्य प्रमाणात तेल, मसालाही वाढला जातो त्यामुळे ती भाजी छान लागते. खाण्याचे असे नियोजन भाऊकाकांसारखा खाद्यप्रेमीच करू शकतो. त्यांना थालीपीठ विशेष आवडीचं. त्याचबरोबर गोपालकालाही. गोडामध्ये पुरणाची पोळी आवडायची, पण सोबत तुपाची वाटी हवीच. भाऊकाकांना स्वत: काही पदार्थ बनवता येत नव्हते. पण त्यातही कच्चा चिवडा बनवायचे. त्याबाबतीतलं त्याचं आवडतं तत्त्वज्ञान हे की आवडते पदार्थ मनसोक्त खायला मिळाले तर ते चविष्ट लागतातच. पण दुसऱ्यांच्या घरी मिळाले तर त्याची लज्जत वेगळीच असते. असे योग येणाऱ्यासाठी संस्कृतमधलं त्यांनी एक सुभाषित सांगितलं,

‘परान्नं प्राप्य दुर्बुद्धे, मा प्राणेशु दयां कुरु।

परान्नं दुर्लभ लोके, प्राणा: जन्मति जन्मिनि! याचा अर्थ असा (माणसा परान्न लाभल्यावर त्याचा पुरेपूर आस्वाद घे. प्रकृतीची चिंता करीत बसू नकोस. अति खाण्यामुळे तब्येत बिघडून प्राण गेले, तरी पर्वा करण्याचे कारण नाही. कारण परान्न दुर्लभ असते. प्राण काय जन्मोजन्मी मिळतोच.) रामभाऊ गेल्यानंतर त्यांच्या मुलाने आशुतोषने त्यांच्या खाण्या-खिलवण्याचा वारसा पुढे नेला आहे. मात्र मला एक खंत आहे ती म्हणजे रामभाऊ आणि सुरेश भट यांचा सहवास मला फार कमी मिळाला. आता ते दोघेही हयात नाहीत, पण आठवणी मात्र कायमच्या कोरल्या गेल्या आहेत.

साहित्यिकांमध्ये मला आवडणारं आणखी एक मोठं नाव म्हणजे महेश एलकुंचवार. यांची वेगळी ओळख सांगायला नकोच. त्यांना भेटल्यावर एक वेगळेपण जाणवतं. त्याचं रोखठोक सरळ बोलणं मनाला भिडतं. त्याच्या घरी गेलं की ते वेगळेपण अधिकच जाणवतं. त्यांच्या घरातलं वातावरण प्रसन्न, नीटनेटकं आणि विचारवंत माणसाच्या घरात आलो आहोत याची साक्ष देणारं, त्यांच्याशी बोलल्यावर, दोन तीनदा भेटल्यावर असं जाणवलं की आपण यांना फार उशिरा भेटलो. आयुष्यात अशा काही व्यक्ती भेटतात की त्यांच्या प्रत्येक भेटीत आपण समृद्ध होतो. एलकुंचवारसर अशा व्यक्तींपैकी एक.

जेवणाबद्दल त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले, विष्णू, फ्रेंचमधले दोन शब्द मी तुला सांगतो ते असे गुरुमांत (gurumand)ि आणि गुरुमेत (gourmet) हे दोन शब्द व्यक्तींच्या खाण्याच्या पद्धतींवर आधारलेले आहेत, त्यातला पहिला शब्द खादाड व्यक्तीसाठी वापरला जातो. अशा व्यक्ती सर्व काही खातात तेही प्रचंड प्रमाणात. दुसरा जो शब्द आहे तो निवडक लोकांसाठी वापरला जातो म्हणजे असं, की ते थोडंच खाणार पण चांगलं खाणार, चांगलं नसेल तर सरळ  सांगणार कि हे चांगलं नाही. तर अशा खाण्याऱ्यांच्या प्रकारात बसणाऱ्या आमच्या एलकुंचवारसरांना साधं जेवण प्रिय आहे. एक गोष्ट बोलण्यातून जाणवली ती म्हणजे त्यांना साधं मराठी जेवण जास्त आवडतं. त्यातही साधं वरण भात आणि त्यावर तुपाची धार, पण वास असलेलं तूप निषिद्धच. मांसाहारी आवडत नाहीच, तो खाण्याचाही त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. एकूणच त्यांना पाहिलं की एकच वाक्य समोर उभं रहातं, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी.

राजकीय क्षेत्रातील खाण्यावर मनापासून प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे, नितीन गडकरी. त्यांना मी अगदी लहानपणापासून ओळखतोय. आमचे बाबा आम्हाला संघात पाठवायचे. त्यावेळी तेही यायचे तिथे. त्यावेळी ते लुनावरून फिरत असत. लुना चढावावर चढत नसे तेव्हा आम्हालाच धक्का द्यावा लागत असे. लुनाला धक्का देण्याच्या निमित्ताने लुनावरून उतरायचं आणि मागच्या मागे पळून जायचं हे आमचे उद्योग! पण त्यांची निर्णयक्षमता माझ्यासाठी आदर्श आहे. त्यांच्या गडकरी वाडय़ात अगदी पूर्वीपासून रोज दोन्ही वेळा जेवणाच्या पंक्ती उठत, अगदी आजही उठतात.  माझ्याबाबतीत एका भाषणात ते म्हणाले होते, यशस्वी होण्यासाठी मुंबईलाच जावं लागतं असं काही नसतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे विष्णू मनोहर!

पुढे त्यांना जेव्हा अपघात झाला होता तेव्हा त्यांच्या पत्नी, कांचनताईंनी मला मुद्दाम त्यांच्या घरी बोलावलं होतं. नितीनजी पट्टीचे खव्वये. अपघाताच्या वेळी घरी राहून राहून इतके कंटाळले होते की त्यांना खाण्यात तरी बदल हवा होता. तेव्हा त्यांना त्यांच्याच फर्माईशीवरून पनीर बटर मसाल्याच्या ग्रेव्हीतली ‘कढाई गोबी’ खायला घातली होती. नितीनजींच्या पदार्थप्रेमाचा अजून एक अनुभव म्हणजे एकदा मी नागपुरात मक्यापासून तयार केलेल्या पदार्थाचा महोत्सव भरवला होता. त्यांना येणं शक्य नव्हतं. पण बहुधा माझीच इच्छा तीव्र होती, त्यामुळे गडचिरोलीला येणारं त्यांचं हेलिकॉप्टर नादुरुस्त झाल्यामुळे त्यांचा दौरा रद्द झाला, पण तडक घरी न जाता ते माझ्या मक्याच्या महोत्सवात आले. माझ्यासाठी ती पर्वणीच ठरली.

आता थोडं आमच्या मधुताईंबद्दल सांगतो. ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांना मी पहिल्यांदा भेटलो ते हैदराबादला. एका चित्रपटाच्या शूटिंगच्या सेटवर. मी त्यात अभिनय करत होतो, पण प्रत्यक्ष काम करायची वेळ आल्यावर मला प्रचंड दडपण आलं होतं (यात माझी तृतीयपंथीयाची भूमिका होती.) पण त्यावेळी त्यांनी मला अशा प्रकारे समजावले की  भूमिकेसाठी मी तयार झालो. जवळपास १६ दिवस आम्ही शूटिंगदरम्यान सोबत होतो. तेव्हा त्यांच्या खाण्याच्याही आवडी-निवडी कळल्या. माझ्या लक्षात आलं की मधुताई खातील मोजकंच पण मन लावून आणि चवीने खातील. मुख्य जेवणाबरोबर त्यांना ताटातल्या डावी उजवी कडलेही पदार्थ आवर्जून लागायचे. ताईंना जेवणात मिरची भारी आवडते. आणि त्या एकटय़ा कधी जेवणार नाहीत, सर्व युनिटबरोबर जेवतात. घरी मात्र त्यांच्या पंगतीला त्यांचा लाडला पोपट आवर्जून असतो. एक किंवा दीड पोळी अर्धी वाटी भात, वरण आणि भाजी पण पोळी ऐवजी भाकरी असेल तर उत्तम. मला आठवतं,आमचं शूटिंग कोल्हापूरला होतं. मी बरोबर झुणका-भाकर नेली होती. ते पाहिल्याबरोबर मधुताईंनी समोरचे चमचमीत पदार्थ बाजूला सारले आणि झुणका-भाकरीवर तुटून पडल्या. असं हे त्यांचं भाकरीप्रेम. रोज नियमित व्यायाम व जेवणात कच्च्या सॅलडचे प्रमाण अधिक यामुळे वयाच्या ५९ व्या वर्षीसुद्धा त्या ‘सखी माझी लावणी’ हा तीन तासांचा कार्यक्रम करू शकतात. पण नुकताच एक अपघात झाला. स्टेजवर नृत्य करता करता त्या पडल्या. सध्या तरी त्या कोणालाही ओळखत नाहीत हे आपलं दुर्दैव आहे.

नवीन कलाकारांमध्ये एक नाव म्हणजे,

अमोल कोल्हे.  हे एक उमदं व्यक्तिमत्त्व. त्यांनी केलेली शिवाजीची भूमिका अप्रतिमच. शिवाजीची भूमिका करण्याच्या आधी अमोल आणि मी एक शो करायचो, ‘शोध सुगरणीचा.’ जवळपास दीड र्वष आम्ही शो बरोबरीने केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बऱ्याच गावी सोबत जायचा योग आला. तेव्हा असं लक्षात आलं की अमोल नुसता कलाकारच नाही तर चांगला ‘कुक’ आहे आणि डॉक्टर असल्यामुळे काय खावे, किती खावे, याचीही त्याला अचूक माहिती आहे. शूटिंगला यायच्या आधी तो त्या विषयावरची बरीच माहिती घेऊन यायचा. त्यामुळे शो पाहाणाऱ्यांना पदार्थाबरोबरच त्या अनुषंगाने इतरही बरीच माहिती मिळायची. संध्याकाळी शूटिंग संपलं की हा जाहीरच करायचा की या गावातल्या त्या अमक्या हॉटेलमध्ये तो पदार्थ चांगला मिळतो की आम्ही सगळे तिकडे. सुगरणीच्या शोधात आम्ही मालवणला शूटिंगसाठी गेलो होतो, तिथला मालवणी रस्सा अमोलला फार आवडला. तो कोणी केला हे शोधून काढून पाककृती विचारून घेतली इतकंच नव्हे तर घरी जाऊन बनवून सुद्धा पाहिला इतका हा दर्दी.

त्यानंतर आणखी एक नाव म्हणजे कविता लाड-मेढेकर. गेल्या सतरा-अठरा वर्षांपासून मराठी चित्रपट, मालिका क्षेत्रात गाजत आहे. माझी तिची ओळख ‘मेजवानी’च्या निमित्ताने झाली. आम्ही दोघांनी मिळून जवळपास ५०० एपिसोड केले. अतिशय अभ्यासू, कामाच्या बाबतीत शिस्तप्रिय त्याचबरोबर स्वत:च्या तब्येतीकडे व आहाराकडे कटाक्षाने लक्ष देणारी अशी ही गुणी अभिनेत्री. शूटिंगकरिता पदार्थ बनवून झाला की ती जेव्हा तो पदार्थ प्रथम चाखायची त्याचं मला प्रचंड दडपण यायचं. कारण पदार्थ चाखल्यावर वर वर जरी छान म्हणत असली तरी मीच ओळखू शकत असे की तो पदार्थ तिला आवडला की नाही. ती नेहमी म्हणते, विष्णूजी पदार्थ मला समजला म्हणजे लोकांना समजेलच असं समजा. जोपर्यंत तिला समजेल अशी कृती दाखवत नाही, तोपर्यंत एपिसोड पूर्ण व्हायचा नाही. तिला आवडणारे पदार्थ म्हणजे इन्स्टंट अनारसा व सावजी रस्सा. त्यांची ती प्रचंड भोक्ती आहे.

सगळ्यांच्या बरोबरीने लक्षात राहिलेलं एक नाव  म्हणजे लालूप्रसाद यादव हे. त्यांना दह्य़ा-दुधाचे पदार्थ तर आवडतातच पण त्याचबरोबर देशी पद्धतीच्या, ग्रामीण पदार्थावर त्यांचे विशेष प्रेम आहे. त्यांना स्वत: स्वयंपाकघरात रमायला आवडतं. याचा प्रत्यय मला जेव्हा त्यांच्या गावी राबडीदेवींच्या महिला संघटनेकरिता आम्ही कुकरी शो करायला पाटणा येथे गेलो असताना आला. त्यांच्या घरातील स्वयंपाकघर हे आधुनिक पद्धतीचे आहे, याशिवाय घराच्या मागे त्यांनी खेळती हवा असलेलं एक स्वयंपाकघर बनविलेलं आहे. त्यामध्ये सूर्यचूल, गोबरगॅस इत्यादी वेगवेगळ्या इंधनांचा वापर होतो. मी माझा पदार्थ खास चुलीवर बनवत होतो. तेव्हा लालूजींची स्वारी अवतरली व म्हणाले, ‘‘अरे! ये बिश्नूजी से हम भी कुछ कम नही, हमारी हात की सत्तू की लिट्टी-चोखा खाओगे तो बाकी खाना भूल जावोगे!’’ आणि मांडा ठोकून त्यांनी स्वत: लिट्टी-चोखा बनवून खायला घातला, खरोखरच चविष्ट.

असे अनेक प्रसंग, घटना, अनुभव माझ्या खाद्यप्रेमात भर टाकणारे. मला संपन्न करत जाणारे. आणखी खूप जणांच्या खूप आठवणी आहेत, पण त्या नंतर केव्हातरी.

विष्णू मनोहर

manohar.vishnu@gmail.com