अनेक वर्षांपूर्वी प्रेमा पुरव यांनी ‘अन्नपूर्णा’ सेवेद्वारा भाजीपोळी डबे पुरवायला सुरुवात केली होती. नोकरदार वर्गासाठी रुचकर, ताजे आणि माफक किमतीचे अन्न. सध्याच्या हेल्थी फूड टिफिन सव्‍‌र्हिसेस त्याचाच आधुनिक अवतार म्हणायला हरकत नसावी. प्रत्येकाच्या आवडीनुसार गरजेप्रमाणे जेवण, तेही योग्य किमतीत. जड डबा न्यायची कटकट नाही की तयार करण्याचीही. सुटसुटीत पॅकिंगमधला आटोपशीर डबा, कप्प्यात आकर्षकपणे मांडलेले जेवण. मग ती नाचणीची भाकरी आणि बार्ली सलाड असो वा आपली खिचडी असो, काकडी-टॉमेटो ज्यूस असो वा क्लिअर व्हेजिटेबल सूप, रोझमेरी चिकन रॅप असो वा पुदिना पराठा. मसालेभात असो वा मेक्सिकन राइस. आपल्याला जे आवडते ते मिळू लागलेले आहे. अशाच वेगवेगळ्या प्रसिद्ध टिफिन सव्‍‌र्हिसची आणि त्यामागची कहाणी.

मुंबई महानगरी, कधीही न झोपणारी, अखंड वाहती असणारी, घाई, गडबड या शहराच्या पाचवीला पुजलेली. इथे मिनिटाचा नाही तर सेकंदाचा हिशोब होतो म्हणून लोकल गाडय़ांचे वेळापत्रकही ८.५५ आणि ९.१८ असे असते. इथला नोकरदार वर्ग या चक्रात कायमचा अडकलेला. सकाळी उठून घाईने आवरून कामावर पळायचे. दुपारी तेथेच काही तरी खायचे आणि वेळ मारून न्यायची. घरून डबा आणणं सगळ्यांनाच शक्य होतं असं नाही.

Millions of online bets on IPL in gadchiroli
गडचिरोली : ‘आयपीएल’वर कोट्यवधीचा ऑनलाईन सट्टा!
south east central railway recruitment 2024 Job opportunities in south east central railway
नोकरीची संधी : ‘दक्षिण पूर्व मध्य रेल्वे’मधील संधी
jalgaon gold price marathi news
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याची ७५ हजारांकडे वाटचाल
heavy traffic in patri pool area in kalyan
कल्याण : पत्रीपुलामुळे पुन्हा मनस्ताप, आता रस्ते कामामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी

घरून पोळीभाजी किंवा जे काही असेल ते आणणारा महत्त्वाचा वर्ग म्हणजे मध्यम वर्ग. खासगी कार्यालयामध्ये असणारा बहुतांशी कर्मचारी वर्ग हा फॅन्सी कॅफेमध्ये किंवा तत्सम ठिकाणी जाताना आढळतो; पण हळूहळू होते काय, की त्याच त्याच ठरावीक जेवणाचा कंटाळा येतो. मसालेदार, तेलाने माखलेले किंवा जंक/फास्ट फूड याशिवाय पर्याय नसतो. अनेकदा काही आरोग्यपूर्ण खावेसे वाटते. व्यायामालाही वेळ नसतो. निदान योग्य आहाराद्वारे तरी तब्येत सांभाळावीशी वाटते. कधी डॉक्टरनीच सज्जड इशारा दिलेला असतो. कधी आपल्यालाच वाटते की, आता जरा व्यवस्थित खाणे सांभाळायला हवे, पण..

हा पण मोठा अडथळा ठरतो. वेळ नाही, सोय नाही, येत नाही, अशी अनेक कारणे अडसर होतात. आहाराद्वारा आरोग्य हा विचार तसा नवा नाही, पण ते पाळणे आणि नोकरीच्या वेळात शक्य होत नाही. सध्या तर आरोग्याबाबत एकूणच जनमत प्रचंड जागरूक होत आहे. आपण किती खातो यापेक्षा काय खातो हे अगदी बारकाईने पाहिले जात आहे आणि जर १२ तासांपेक्षा अधिक वेळ जर घराबाहेर असू, तर आपला आहार हा तसाच चोख असणे गरजेचे आहे हे आता लोकांना पूर्ण उमगले आहे.

फार नाही, अगदी दहा-पंधरा वष्रे आधी डबा म्हटले की ठरावीक असायचा. पोळी-भाजी, डाळ-भात आणि त्याला जरा आकर्षक करायला लोणचं, सॅलड वा कोशिंबिरीच्या नावाखाली  चार-दोन टोमॅटो, काकडीच्या चकत्या भरून स्वत: डबा घेऊन कार्यालयात येणाऱ्या मंडळींचा ‘डबा’ तसा फार वेगळा, आकर्षक आणि जाणिवपूर्वक आरोग्यपूर्ण असण्याची फारशी शक्यता नव्हती. आणि जे पर्याय उपलब्ध होते ते अगदी महाग.

लंच किंवा वर्किंग लंचकडे पाहण्याच्या दृष्टीने जो फरक पडला आहे त्याचे श्रेय हे इंटरनेट किंवा माहिती तंत्रज्ञानाच्या स्फोटाला द्यावे लागेल, ज्यामुळे लोकांना विविध प्रकारच्या कल्पना मिळू लागल्या आणि त्यानुसार मागणी वाढू लागली, असे मत ‘फूडीज’ या प्रसिद्ध ‘टिफिन सव्‍‌र्हिस’च्या सोबीन जॉर्ज थॉमस याने व्यक्त केले. सोबीनच्या ‘फूडीज’तर्फे एकदम आरोग्यपूर्ण आणि आहारशास्त्राला अनुसरून डबे पुरवले जातात, असं त्याचं म्हणणं आहे.

‘सोबीन’ या सेवेची अनेक वैशिष्टय़े आहेत. त्याचा एक ठरावीक असा मेन्यू आहेच आहे; पण त्याच्याव्यतिरिक्तही जर एखाद्याला वेगळे काही हवं असेल तर तो ग्राहक ‘सोबीन’च्या साइटवर जाऊन आपले दुपारचे जेवण अथवा रात्रीचे जेवण ठरवू शकतो. म्हणजे आपण जसे घरी ठरवतो तसेच. आधी काय व्हायचे, की आपल्या डब्याचा मेन्यू हा तो तयार करणाऱ्यावर अवलंबून असायचा. म्हणजे काहीतरी हलके खावेसे वाटताना डब्यात नेमके चमचमीत मसालेदार मिळायचे किंवा अनेकदा हवे ते मिळायचेच नाही.

‘सोबीन’च्या मते सध्या जी हेल्दी फूड सप्लाय, सव्‍‌र्हिस म्हणजे आरोग्यपूर्ण टिफिन/डबे पुरवले जातात त्यामागे हे महत्त्वाचे कारण आहे. सोबीनतर्फे दिल्या जाणाऱ्या डब्याची किंमत ठरलेली नसते. जर समजा भेंडी आहे आणि तिची मागणी वाढली तर त्या भाजीची किंमत कमी होते. शाकाहारी-मांसाहारी दोन्ही प्रकारचे पर्याय इथे आहेत. महत्त्वाचे म्हणजे सध्या प्रचंड लोकप्रिय असलेले ‘किटो डायट’ ‘फूडीज’तर्फे पुरवले जाते. ‘कस्टमाइज मिल्स’ हे इथले मुख्य तत्त्व.

लोकांच्या खाण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता संपूर्णपणे पालटतोय आणि त्याला गंभीरपणे घेतले जातेय, असे अंचित पालटा या आधुनिक डबे पुरवठादाराचे मत आहे. त्याची ‘सुपर फूडज किचन’ ही कंपनी मुंबईभर डबे पुरवते. अंचितच्या मते डबा, तोही नोकरीच्या ठिकाणचा डबा, हा सुटसुटीत पण पौष्टिक हवा. त्याच्या मते लोकांना वेळ नसतो. कामाच्या ठिकाणी घाईघाईत खाणे उरकण्याकडे कल असतो, त्यामुळे आधी नाइलाजाने वडापाव, सँडविच असेही पर्याय निवडले जायचे. अनेकदा इच्छा असूनही बाकी पर्याय उपलब्ध नसायचे. अंचितने नेमके हे हेरून सुटसुटीत डबे देणे सुरू केले. रॅप्स, सँडविच आणि ज्यूस असे जेवण अंचित पुरवतो. त्यांच्या डब्यातले बार्ली सॅलड, मशरूम बार्ली सूप, मेड चीक, सॅलड, मशरूम रॅप, पेरी पेरी चिकन रॅप, डी टॉक्स ज्यूस अत्यंत लोकप्रिय झालेले आहेत.

अंचितचे ५०० ते ६०० ग्राहक ठरलेले आहेत ज्यांना त्यांच्या टेबलावर स्वच्छ, ताजे आणि आरोग्यपूर्ण असे दुपारचे जेवण आकर्षक डब्यातून पुरवले जाते. अंचितच्या मते स्वत:च्या आरोग्यासाठी आता लोक जागरूक झालेले आहेत. त्याचा फायदा त्याला मिळतो.

पूनम कपूर या फूड टेक्नॉलॉजीच्या पदवीधर तरुणीने हाच बदल टिपला. सुरुवातीला तिने काही बहुराष्ट्रीय कंपनीसोबत काम केले. तेथे काम करताना तिच्या लक्षात आले की, योग्य चौरस आहार काय आहे याची कल्पना अनेकांना असते; पण तो कसा करायचा हे माहीत नसते. पूनमने एकाला डी-टॉक्स ज्यूस कसा करायचा ते सांगितले आणि त्यातून ‘पूनम कपूर किचन’चा जन्म झाला.

गेली सहा वष्रे पूनम या व्यवसायात आहे. सुरुवातीला घरातूनच ती डबे करायची, पण आता मात्र सेंट्रल किचनमधून मुंबईभर डबे जातात. फूड टेक्नॉलॉजीतील शिक्षणाचा अनुभव असल्याने आहार आणि विज्ञान याची सांगड पूनम व्यवस्थित घालते. भारतीय आणि विदेशी, शाकाहारी-मांसाहारी असे सर्व प्रकारचे जेवण ती पुरवते.

पूनमच्या मते रोज एक प्रकारचे खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे ती मेन्यू सतत बदलते आणि ग्राहकाच्या सूचनेप्रमाणे बदल घडवत राहते. एखादा आठवडा लो कॅलरी जेवण आणि ज्यूस घेणाऱ्याला दुसऱ्या आठवडय़ात थेट भारतीय चिकन करी राइस वा पनीर मसाला खावासा वाटू शकतो आणि आपल्याला तसे लवचीक राहावेच लागते. पूनमच्या मेन्यूत प्रचंड वैविध्य आहे. तिच्या मते डाएट खाणे म्हणजे बेचव हा विचारच चुकीचा आहे.

अशा प्रकारचे संपूर्ण वेगळे जेवण देणारी अजून एक जागा म्हणजे ‘व्हेगन बाइट्स’. समीर पसाद यांच्या या सेवेद्वारे मुंबईभर व्हेगन जेवण पुरवले जाते. व्हेगन म्हणजे यात मांसाहारी किंवा दूध आणि दुग्धजन्य असे काहीही नसते. समीरच्या मते व्हेगन चळवळ जगभर प्रसिद्ध आहे; पण अनेकांना तसे जेवण मिळतेच असे नाही. ‘व्हेगन बाइट्स’तर्फे १०० टक्के शुद्ध शाकाहारी जेवण पुरवले जाते. बीट रुट, कटलेट, नाचणी इडली, करी सलाड, पालक, मेथी, राइस पुदिना चटणी, टोमॅटो सूप, ज्यूस असे असंख्य पर्याय येथे उपलब्ध आहेत.

‘द डायट’ या संस्थेद्वारा असेच उत्कृष्ट जेवण पुरवले जाते. निमिषा अय्यर आणि प्रीती गोसाई या दोघींच्या कल्पनेतून साकार झालेली ही संस्था. निमिषाच्या मते, डाएट फूड म्हणजे शुष्क बेचव उकडलेले जेवण ही कल्पनाच मुळात चुकीची आहे. ‘द डायट’तर्फे भाजलेले, परतलेले, उकडलेले, पण चवदार आणि वैविध्यपूर्ण जेवण सुटसुटीत डब्यामधून मुंबईभर पोहोचण्यात येते. प्रत्येक जेवणाच्या डब्यावर त्यातून किती कॅलरी मिळणार आहेत हे स्पष्ट लिहिलेले असते.

शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकार जेवण येथून दिले जाते. मल्टिगेन, गाíलक ब्रेड, रोझमेरी चिकन, गाजर, कोथिंबीर, योगर्ट स्पाइस मफिन, रोस्ट पम्पकिन सलाड, बैंगन भरता, बार्ली मसाला रोटी, ग्रीन चना चाट असे अनेक चवदार पदार्थ ग्राहकांना मिळतात. आहारतज्ज्ञ असल्यामुळे प्रीती गोसाई मेन्यू ठरवताना चव आणि पोषणमूल्य यांचा व्यवस्थित ताळमेळ घालते आणि चवदार आणि आरोग्यपूर्ण चौरस आहार पुरवला जातो.

नोकरी-व्यवसाय – धावपळ ही द्वयी मुंबई, नवी मुंबई आणि आजूबाजूच्या भागांतील रहिवाशांच्या नशिबी कायमचीच आहे. अगदी ५०/७५ वर्षांपूर्वी न्यायालयात कामाला जाणारे भाऊसाहेब किंवा तात्यासाहेब नऊ वाजता वरणभात, भाजीपोळी असे जेवून कचेरीत जायचे. परळच्या लालबागच्या गिरणीतील कामगार अ‍ॅल्युमिनियमच्या डब्यात चपाती-भाजी न्यायचा. कामाच्या टेबलावर वा शॉप फ्लोअरवर पटपट जेवण उरकले जायचे. हळूहळू यात फरक पडत गेला. प्रवास वाढला, वेळ वाढला. आता ना संपूर्ण चारी ठाव जेवायला वेळ आहे ना तसे करायला, पण भूक ती तर कायमच आहे. घरी कोणी करणारे असेल तर उत्तम, पण जर नाही तर काय? मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक येथे नोकरी-व्यवसायातील एकटे राहणाऱ्या स्त्री-पुरुषांची संख्या लक्षणीय रीतीने वाढत आहे. बाईने पहाटे उठून आपला आणि इतरांचा डबा तयार करायचा हे आजही प्रचलित असले तरी सर्वानाच ते जमतेच असे नाही. यात हल्ली आरोग्याबद्दल जागरूकता वाढत चाललेली आहे. धावपळीच्या आयुष्यामुळे अनेक व्याधी, दुखणी लागत आहेत. स्वयंपाकाला, व्यायामाला वेळ नाही आणि स्वत: करायचे तर जमत नाही.

मुंबईत आणि इतर ठिकाणी अशी माणसे आढळणे नवे नाही. नोकरीच्या वेळा, प्रवासाच्या वेळा बदलत आहेत. परंपरागत कामे आणि स्वरूपही पालटलेय अशा पाश्र्वभूमीवरच खाण्यापिण्याच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या सेवासुविधा गरजेच्या ठरत आहेत. आमच्या वेळी नव्हती ही फॅडं असे हिणवण्याचा जमाना गेला.

योग्य आहार ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे आणि आपल्या धावपळीच्या आयुष्यात ते टिकवावेच लागणार. जे काम अशा सेवाद्वारे होत आहे. इथे नमूद केलेल्या सेवाखेरीज असंख्य अनेक लहानमोठय़ा सुविधा मुंबईत उपलब्ध आहेत.

कामाच्या ठिकाणी पंधरा तास काम करणाऱ्या अनेकांच्या आरोग्याचे जतन या ‘हेल्थी फूड टिफिन’ सव्‍‌र्हिसद्वारा केले जात आहे. मुख्य म्हणजे सध्या बदल असा आहे की, मला काय हवे आहे हे ग्राहक ठरवतोय. तशा सूचना देतो आणि त्यानुसार शिजवलले अन्न आकर्षक अशा डब्यातून टेबलावर येत आहे. एकूण समाज ग्राहककेंद्री होत असल्याचा उत्कृष्ट उदाहरण गरज आणि आवड यांचा व्यवस्थित वेळ येथे साधला जात आहे. अनेक वर्षांपूर्वी प्रेमा पुरव यांनी ‘अन्नपूर्णा’ सेवेद्वारा भाजीपोळी डबे पुरवायला सुरुवात केली होती. नोकरदार वर्गासाठी रुचकर, ताजे आणि माफक किमतीचे अन्न.

सध्याच्या हेल्थी फूड टिफिन सव्‍‌र्हिसेस त्याचाच आधुनिक अवतार म्हणायला हरकत नसावी. प्रत्येकाच्या आवडीनुसार गरजेप्रमाणे जेवण, तेही योग्य किमतीत. जड डबा न्यायची कटकट नाही की तयार करण्याचीही. सुटसुटीत पॅकिंगमधला आटोपशीर डबा, कप्प्यात आकर्षकपणे मांडलेले जेवण. मग ती नाचणीची भाकरी आणि बार्ली सलाड असो वा आपली खिचडी असो, काकडी-टोमॅटो ज्यूस असो वा क्लिअर व्हेजिटेबल सूप, रोझमेरी चिकन रॅप असो वा पुदिना पराठा. मसालेभात असो वा मेक्सिकन राइस. आपल्याला जे आवडते ते मिळू लागलेले आहे, तेही आटोपशीर किमतीत आणि या सेवांची वाढणारी व्याप्ती अशा बदलत्या मनोवृत्तीचे निदर्शक आहे.

सोबीनचे अनेक ग्राहक स्वत:च्या आरोग्याविषयी अत्यंत जागरूक असतात आणि डबा सुरू करण्याच्या आधी आहारतज्ज्ञाकडे किंवा डॉक्टरांकडे जाणून, विचारून, स्वत: शोधून, माहिती मिळवून येतात. अंचित म्हणाला, ‘‘व्हेगन फूड देताना तो सुरुवातीला साशंक होता की, दाल सब्जीवाल्या भारतीय जिभेला हे जेवण कितपत पचनी पडेल. पण आवडतय लोकांना.’’ पूनमच्या मते, ‘‘आताचा ग्राहक हा अत्यंत चोखंदळ आहे. त्यामुळे आपल्यालाही सेवेचा दर्जा तसाच चोख ठेवावा लागतो. कधी तरी असे होते की, नमूद केलेल्या मेन्यूनुसार ते पदार्थ देणे शक्य होत नाही. अशा वेळी पर्याय असणे अत्यंत गरजेचे असते. सोबीनही त्याच्या हेल्दी ग्राहकांकडून मिळणाऱ्या टिप्स आचरणात आणतो आहे. अंचितचे ग्राहकही त्याच्याशी बांधले गेलेले आहेत.

लंच टाइममधला डबा खाणे हे काम उरकणे राहिलेले नसून एक डोळस प्रयत्न आहे, आरोग्याच्या दृष्टीने..

शुभा प्रभू-साटम shubhaprabhusatam@gmail.com