कोल्हापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेतंर्गत जिल्ह्यातील 363 आरोग्य उपकेंद्रांसाठी जवळपास 17 कोटी 94 लाखांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शुक्रवारी दिली.

आयुष्यमान भारत योजनेतंर्गत आरोग्य सेवेकडे उपलब्ध असलेल्या आरोग्य उपकेंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये रूपांतर करण्यासाठी या उपकेंद्रांची डागडूजी करणे, उपकेंद्रे रंगरंगोटी सही मजबूत करणे यासाठी हा निधी प्राप्त झाला असल्याचे यड्रावकर यांनी सांगितले.

करोना संसर्गाचा मागील दीड वर्षाच्या कार्यकाळात आरोग्य विभागातील सर्व घटकांनी जबाबदारीने काम केले आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे यांनी सक्षमपणे आपली भूमिका आणि जबाबदारी सांभाळली होती आणि ती आजही सांभाळत आहेत. या उपकेंद्रांमार्फत नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याबरोबरच आरोग्याबाबतच्या सर्वेक्षणाचे कामसुध्दा जबाबदारीने पार पाडले गेले आहे. एकुणच आरोग्य उपकेंद्रे यांची गरज करोना महामारीच्या काळात प्रभावीपणे जाणवली आहे. त्यामुळे यापुढच्या काळात ही सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे आणखीन मजबूत करणे गरजेचे आहे, असेही  यड्रावकर यांनी सांगितले.