महापालिका प्रशासन थंड दयानंद लिपारे, कोल्हापूर कोल्हापूरकरांच्या डोक्यावर धोदायक इमारतींची तलवार लटकत आहे. ५९ धोकादायक इमारतींमुळे जीव मुठीत घेऊ न वावरावे लागत आहे. महापालिका प्रशासनालाही पावसाळा आला की कारवाई आठवते. नोटीस बजावण्याचे सोपस्कार पार पडले जाते. पुन्हा ये रे मागल्या असा नागरिकांचा अनुभव आहे. पुणे-मुंबई येथे बांधकामाच्या दुर्घटनांमध्ये अनेकांना प्राण गमवावा लागल्याची घटना ताजी असल्याने अशी दुर्दैवी वेळ येण्याची प्रतीक्षा प्रशासन करीत आहे का, असा सवाल सरकारी अनावस्थेवर केला जात आहे. कोल्हापूर शहरात जुन्या इमारतींची संख्या मोठी आहे. पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींचा सव्र्हे करण्याचे सोपस्कार आवरले जाते. त्यामध्ये तीन वर्षांंपूर्वी केलेल्या सव्र्हेत ९० इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले. ही आकडेवारी आधीपेक्षा अधिक होती. यंदा हा आकडा ५९ इतका आहे. त्याच त्या इमारती प्रतिवर्षीच्या सव्र्हेत आढळतात. प्रशासन आला पावसाळा की धोकादायक बांधकाम काढून घ्यावे, अशा नोटीस अथकपणे देऊ न आपले कर्तव्य पूर्ण करण्यात अजिबात कुचराई करीत नाही. कारवाईचा आढावा घेतला तर निराशाच पदरी येते. प्रशासनाचे दुर्लक्ष, नगरसेवकांचा दबाव धोकादायक इमारतीं पाडण्याच्या कारवाईला मुहूर्त कधी उगवणार या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही. कारवाईचे कागदी घोडे नाचवण्यात प्रशासन तरबेज आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती विभागही महापालिका प्रशासनाच्या अहवालावर समाधान मानण्यात व्यग्र आहे. हाताच्या बोटावर मोजण्या इतके मिळकतधारक नोटिशींची गंभीर दखल घेतात, बाकीचे त्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. जीव मुठीत घेऊ न जीर्ण इमारतीमध्ये वास्तव करतात तर काही जण बिनदिक्कत व्यवसाय करतात. त्यांचा परवाना रद्द करणे शक्य असतानाही त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते. महापालिका सभागृहात नगरसेवक याविषयावर तावातावाने चर्चा करतात, पण पावसाच्या पाण्याबरोबर त्यांचा उत्साहही मावळतो असा अनेक वर्षांचा अनुभव आहे. काही जण तर कारवाई होऊ नये यासाठी प्रशासनावर दबाबाव आणतात, असे निरीक्षण आपत्ती कार्यात असणारे व्हाइट आर्मीचे प्रमुख अशोक रोकडे यांनी नोंदवले आहे. गणेशोत्सवातही विघ्न गणेशोत्सवात या इमारती सुरक्षित नाही. गणेशोत्सव मिरवणुकीवेळी डॉल्बी च्या आवाजाने इमारत कोसळून जीव गमवावा लागला होता. धोकादायक इमारतींकडे एक नजर टाकली तर मिरवणूक मार्गावरच २२ इमारती ठाण मारून उभ्या आहेत. विसर्जन मिरवणुकीमध्ये भाविकांना त्रास होऊ नये, यासाठी बैठक जाते, त्याचाही परिणाम शून्य आहे. याबाबत नगर अभियंता नेत्रदीपक सरनोबत यांनी मंगळवारी सांगितले, ‘शहरातील सर्व ५९ धोकादायक इमारतींच्या मिळकतधारकांना नोटिसाही बजावल्या आहेत. त्यात ९ अतिधोकादायक आहेत. बरेच जण न्यायालयात जात असल्याने प्रशासनाचा नाइलाज होतो. तरीही धाडसाने कारवाई केली आहे. आज बिंदू चौकातील चार अतिधोकादायक इमारती हटवल्या आहेत. स्थगिती उठवली जावी यासाठी न्यायालयाकडे प्रयत्न केले जात आहेत. कोणाला कसलाही धोका पोहोचू नये याची काळजी घेतली जात आहे.’ तर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख प्रसाद सपकाळ यांनी ८ मे रोजी झालेल्या जिल्हा आपत्ती निवारण बैठकीत महापालिका, सर्व नगरपालिका यांना धोकादायक इमारती काढून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. ही कारवाई होण्यासाठी लक्ष दिले जात आहे, असे सांगितले. महापालिकेच्या दिव्याखाली अंधार कोल्हापूर महापालिकेने सफाई कर्मचाऱ्यांसाठी संभाजीनगरमध्ये मोठी घरकुल योजना राबवली आहे. सुमारे १०० कुटुंबे येथील अपार्टमेंटमध्ये राहतात. ही इमारत जीर्ण झाली असून तीवर झाडे उगवली आहेत. इमारतीमध्ये गळतीचे प्रमाण लक्षणीय आहे. धोकादायक इमारतींकडे लक्ष पुरवणारे प्रशासनाच्या दिव्याखालचा अंधार कधी पाहणार, असा प्रश्न केला जात आहे.