बियाणे विक्रेत्याबाबत शेतकऱ्याची तक्रार आली तर विक्रेत्यासह संबंधित कार्यक्षेत्रातील गुणनियंत्रक निरीक्षकावर कारवाई केली जाईल, असा इशारा विभागीय कृषी सहसंचालक डॉ. एन. टी. शिसोदे यांनी दिला. कृषी सेवा केंद्र चालकांनी बियाणे खपिवण्यासाठी बियाणांचे खतांबरोबर लिंकिंग केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे सांगत सावध राहण्यास त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद कृषी विभागाच्यावतीने खरीप हंगामाच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील खते, बी-बियाणे विक्रेत्यांची कार्यशाळा घेण्यात आली असता डॉ. शिसोदे यांनी विक्रेत्यांच्या जबाबदाऱ्या व कृषी खात्याची कर्तव्ये याबाबत खडसावले. डॉ. शिसोदे म्हणाले,की गेल्या वर्षी १ लाख ४४ हजार शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेतले, यावर्षी किमान अडीच लाख शेतकऱ्यांना मृद् आरोग्य पत्रिका देणार आहोत. केंद्र तपासणीची जबाबदारी आता एकाच निरीक्षकाकडे देणार आहे. चुकीच्या घटना घडल्या तर विक्रेत्यासह संबंधित निरीक्षकांवर कारवाई करू. यंदा बियाण्याची मागणी वाढणार आहे, स्वतजवळचे बियाणे वापरताना त्याची बीज प्रक्रिया कशी करावी याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना विक्रेत्यांनी करावे, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी म्हणाले,की खते व बियाणांचा गरव्यवहार व काळाबाजारास आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांनी थेट कृषी विभागाशी संपर्क साधावा, यासाठी विक्रेत्यांनी निरीक्षकांचे संपर्क क्रमांक ठळक लावावेत. या वेळी ‘महाबीज’चे सुरेश मोहकर, मोहीम अधिकारी रोकडे, आदी उपस्थित होते.