कारखाना पुन्हा सुरू करण्यावरून चालढकल कोल्हापूर : आजरा सहकारी साखर कारखान्याचे भवितव्य दिवसेंदिवस अंधकारमय बनत आहे. आगामी हंगामात कारखाना चालविण्यास देण्याच्या वाटाघाटी सुरू असल्या तरी ठोस निर्णय होत नसल्याने सभासद, कामगारांमध्ये अस्वस्थता आहे. कारखाना संचालकांना सुरू करायचा नाही, अशी संतप्त भावना व्यक्त करीत कामगार, तोढणी-ओढणी वाहतूकदार व सभासदांनी याविषयी बैठकीत संचालकांना धारेवर धरले. आजरा साखर कारखाना गेले वर्षभर वादात सापडला आहे. संतप्त कामगारांनी अध्यक्ष अशोक चराटी यांचे दालन आणि कार्यालयाला मार्च महिन्यात टाळे लावले होते.तर, कारखाना अखेर चालवण्यास देण्याचा ठराव सभासदांनी बहुमताने मंजूर केला. घटना होऊ नही संचालक मंडळ काहीच हालचाली करीत नसल्याने शेतकरी सभासद, कामगार गोंधळात पडले आहेत. अशातच आगामी हंगामासाठी आजरा कारखान्याच्या काही संचालकांनी आपल्या ऊ स गाळपाचे करार आपल्या कारखान्याशी करण्याऐवजी इतर कारखान्यांशी केले आहेत. त्यातून आजरा कारखाना संचालकांना सुरू करायचा नाही अशी संतप्त भावना व्यक्त करीत कामगार, तोढणी-ओढणी वाहतूकदार व सभासदांनी संचालकांना धारेवर धरले. तब्बल तीन तास संचालक, कामगार व तोढणी-ओढणी वाहतूकदार यांची खडाजंगी झाली. आनंदराव कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून पुढील कामकाज करावे, अशी सूचनाही मांडण्यात आली. ज्येष्ठ संचालक मुकुंदराव देसाई, संचालक अमृते, कॉ. संपत देसाई, विष्णूपंत केसरकर, प्रा. सुनील शिंत्रे कामगारांच्यावतीने संघटनेचे अध्यक्ष धनाजी किल्लेदार, यांनी भूमिका मांडली. अध्यक्ष निवडीची घाई आजरा कारखान्याची चार सप्टेंबर रोजी अध्यक्ष निवड सुरु असून त्याच्या पडद्यामागे हालचाली सुरू आहेत. याचा सुगावा लागल्याने 'तुम्हाला कारखाना सुरू करण्याऐवजी चेअरमन निवडीची घाई झाली आहे काय' असा सवाल संतप्त कामगारांनी केला. सत्ताधारी संचालक दिगंबर देसाई यांनी कारखाना सुरू करण्याबाबत सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. या वेळी 'आम्ही भाषण ऐकायला आलो नाही, मुद्याचं बोला' अशी सूचना कामगारांनी केली.