दयानंद लिपारे

विधानसभा निवडणुकांसाठी हालचाली सुरू

विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्य़ातील दोन्ही गडांवर शिवसेनेचा भगवा फडकला. या शानदार यशामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात सशक्त, प्रबळ पक्ष म्हणून शिवसेना पुढे आली आहे. दोन खासदार, सहा आमदार असलेली शिवसेना आणि राज्य मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे स्थान, दोन आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष अशी मजबूत भाजप यांच्या जोडीला संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभेची खासदारकी अशा भरभक्कम महायुतीशी सामना करणे हे शक्तिहीन बनलेल्या विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी समोर मोठे आव्हान असणार आहे. काँग्रेसला विधानसभेचे खाते उघडणे आणि राष्ट्रवादीला दोन आमदारांचा आकडा वाढवणे हे दिव्य असणार आहे. उभय काँग्रेसच्या जुन्याजाणत्या अनुभवी नेतृत्वाची लढत तुलनेने तरुण चेहरा असलेल्या महायुतीशी होणार आहे.

आजवरचा इतिहास पाहिला तर कोल्हापूर जिल्ह्याने काँग्रेसच्या बाजूने मतांचे दान टाकले. शेकापच्या पतनानंतर काँग्रेस हीच मुख्य पसंत राहिली. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर घडय़ाळाची टिकटिक मोठय़ा प्रमाणात वाजू लागली. गेल्या विधानसभा निवडणुकीत उभय काँग्रेसच्या अस्तित्वाला तडा गेला. काँग्रेसला तर एकही जागेवर विजय मिळवता आला नाही. पुढे, विधान परिषद निवडणुकीत सतेज पाटील यांनी विजय मिळवल्याने काँग्रेसकडे मागील दाराने गेलेला का असेना पण एक आमदार राहिल्याने पक्षाची अब्रू राहिली. राष्ट्रवादीच्या एका वेळी मंत्रिपदाच्या तीन लाल दिव्याच्या गाडय़ा जिल्ह्यात फिरत होत्या, याच पक्षाचे हसन मुश्रीफ व संध्यादेवी कुपेकर हे दोनच आमदार गत वेळी निवडून आले. जिल्हा परिषदेची सत्ता दोन्ही काँग्रेसला गमवावी लागली.

महायुतीचा वाढता विस्तार

याउलट, महायुतीचा विस्तार वाढतच गेला. राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील या आमदारांच्या जोडीला गेल्या वेळी उल्हास पाटील आणि प्रकाश आबिटकर असे आणखी दोन आमदार विजयी झाले. भाजपने सुरेश हाळवणकर यांच्या खेरीज अमल महाडिक ही नवी जागा निवडून आणली. पदवीधर मतदार संघातून निवडून आलेले चंद्रकांत पाटील यांच्याकडे महसूल मंत्रिपद आले. याच काळात छत्रपती घराणेही भाजपच्या तंबूत दाखल झाले.  लोकसभेचा मार्ग चुकलेले संभाजीराजे छत्रपती राज्यसभेत पोहोचले. तर, समरजितसिंह घाटगे यांना ‘म्हाडा’ पुणेचे अध्यक्षपद मिळाले. महायुतीच्या या ताकदीमध्ये यामध्ये आता संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांची भर पडली आहे. बळकट झालेल्या महायुतीचा प्रभाव विधानसभा निवडणुकीत दिसण्याची चिन्हे आहेत.

आघाडीसमोर आव्हानांचा डोंगर

केंद्र आणि राज्य अशा दोन्ही ठिकाणी सत्ता असल्याने दोन्ही काँग्रेसमध्ये चैतन्य होते. सत्तेचा डोस बंद झाल्यावर त्यांचे कुपोषण सुरू झाले. सक्षम विरोधी पक्ष म्हणून प्रभाव पाडण्यातही ते अपयशी ठरले. सहा महिन्यांपूर्वी तीन राज्यांत काँग्रेसची सत्ता आल्यानंतर त्यांच्यात पुन्हा उत्साह संचारला होता. लोकसभेच्या निकालाने तो आता मावळला आहे. अशा वातावरणात उभय काँग्रेसला महायुतीचे आव्हान पेलायचे आहे. अशातच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची भूमिका आणखी निर्णायक ठरू शकते. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे शोधण्यात सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आणि इच्छुक उमेदवार गर्क आहेत. हा गृहपाठ झाल्यानंतर पुन्हा मैदानात उतरण्याची त्यांची तयारी दिसते. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश आवाडे आणि राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या प्राथमिक प्रतिक्रीया याच स्वरूपाच्या आहेत. नव्या आव्हानाला सामोरे जाताना कोणती तयारी आणि मुद्दे घेऊ न आघाडी आखाडय़ात उतरणार हे लक्षवेधी ठरणार आहे.