ऊसाला दर मिळावा म्हणून शेतकऱ्यांच्या बाजूने वर्षानुवर्षे लढणाऱ्या खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला निवडणूक आयोगाने यंदाच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी 'बॅट' हे चिन्ह दिले आहे. यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत खासदार शेट्टी व त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना बॅट घेऊनच निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत. गत निवडणुकीत (२०१४) स्वाभिमानी शेतकरी संघटनेला शिट्टी हे चिन्ह मिळाले होते. स्वाभिमानी पक्ष अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष आहे. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने स्वाभिमानी पक्षाला "बॅट" हे चिन्ह अधिकृत केले असून खासदार शेट्टी 'बॅट' हे चिन्ह घेऊनच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उतरणार आहेत. ज्या-ज्या ठिकाणी स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार राहतील, त्या ठिकाणी 'बॅट' हे चिन्ह घेऊन स्वाभिमानीचे उमेदवार मैदानात उतरणार आहेत. नवीन चिन्ह मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत राजू शेट्टी कोणत्या प्रकारची बॅटिंग करतात, हे पाहणे महत्वाचे आहे.