निवडणुका आल्या की राजकीय नेत्यांमध्ये पक्ष बदलाचे वारे राज्याला नवीन नाही. सत्तेसाठी कोणताच पक्ष कोणाला वर्ज्य नसतो. विचारधारा, निष्ठा सगळ्या गोष्टी बाजूला सारल्या जातात. मात्र राजकारण एका पक्षात आणि काम भलत्याच संघटनेत असं सहसा दिसत नाही. मात्र हे नवं समीकरण बीडमध्ये पाहायला मिळणार आहे. बीड जिल्ह्यातील शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्या पूजा मोरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मंचावरून शेतकरी प्रश्न मांडणार आहेत. यासाठी त्यांनी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या व्यासपीठावर हजेरी लावली होती. बीड जिल्ह्यातील गेवराई येथील शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्या पूजा मोरे यांनी शुक्रवारी जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत खासदार राजू शेट्टी आणि रविकांत तुपकरे यांची भेट घेतली. शेतकऱ्यांविषयीची बांधिलकी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणारे एक व्यासपीठ म्हणून स्वाभिमानी संघटनेसोबत काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांच्यासाठी लढा देताना या संघटनेत सहभागी झाल्यानंतर राजकीयदृष्ट्या शिवसेना पक्षातच सक्रिय काम करणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. मोरे यांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शिवसेना कमी पडत आहे का? असा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.