काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सत्तेस ओहोटी

काँग्रेस – राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात उभय काँग्रेसला ओहोटी लागली असून भाजपमध्ये प्रवेश करण्याची चढाओढ लागली आहे. नगरपालिका निवडणुकीपाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीत हाती कमळ धरण्यासाठी रीघ लागलेली आहे. ती पाहता जिल्हा परिषदेवरील काँग्रेसच्या सत्तेला धोका निर्माण झाला असून भाजप मित्रपक्षांसह सत्ता काबीज करणार का, असे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेसमुक्त भारत ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा कोल्हापुरात साकारण्याचा दिशेने जोरदार वाटचाल सुरू आहे.

ग्रामीण भागात तोळामासा असलेली भाजपाची ताकद दिवसेंदिवस वाढू लागली आहे. तर, काँग्रेस गटबाजीने पोखरला असून राष्ट्रवादीचे एकेक मोहरे गळू लागल्याने जोरदार ओहोटी थांबवण्याची चिंता नेतृत्वासमोर निर्माण झाली आहे. नगरपालिका निवडणुकीप्रमाणे उभय काँग्रेसमधील ताकदवान स्थानिक कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देऊन भाजपाला मजबूत करण्याचे धोरण जिल्हा परिषद निवडणुकीवेळीही कायम ठेवले आहे. प्रवेश करणाऱ्याची गती आणि संख्या पाहता उभय काँग्रेसमध्ये कोणी मात्तब्बर राहणार का, असा प्रश्न पडण्यासारखी स्थिती उद्धभवली आहे.  कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपाची स्थिती फारशी मजबूत नव्हती. नगरपालिका निवडणुकीत निमशहरी भागातील अनेक प्रमुखांना भाजपात प्रवेश देण्याची खेळी यशस्वी ठरली. ५ नगरपालिकांत भाजपाची सत्ता आली. केंद्रात, राज्यात आणि पालिका पातळीवरही भाजपची सत्ता आल्याने ग्रामीण भागातील स्थानिक नेत्यांमध्ये त्याचा परिणाम झाला. हातकणंगले तालुक्यातील राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांनी भाजपाची वाट धरली. पाठोपाठ शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अनिलकुमार यादव, तसेच राष्ट्रवादीचे रत्नाप्पाण्णा कुंभार मागासवर्गीय सूतगिरणीचे अध्यक्ष, दलितमित्र अशोकराव माने, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक िनबाळकर व ज्येष्ठ नेते धनाजीराव जगदाळे, शिक्षणसम्राट डॉ. विजयराज मगदूम यांच्यासह १२ गावांचे सरपंच, विविध सहकारी संस्थांचे संचालक भाजपमध्ये प्रवेश करते झाले. गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांच्यासह काही प्रमुख भाजपमध्ये प्रवेश करते झाले. येत्या काही दिवसात आणखी काही प्रमुख स्थानिक नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

  दुहेरी पर्याय

काँग्रेस – राष्ट्रवादीला रामराम ठोकणाऱ्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यात दुहेरी पर्याय उपलब्ध आहे. एकतर थेट भाजपमध्ये प्रवेश करायचा. अथवा आमदार महादेवराव महाडिक यांचे सुपुत्र स्वरूप हे अध्यक्ष असलेल्या ताराराणी आघाडीत प्रवेश करायचा. विधान परिषदेतील पराभव महाडिक यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे तद्नंतरच्या कोणत्याही निवडणुकीत ते उभय काँग्रेसचे खच्चीकरण करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांचे पुत्र अमल हे भाजपचे आमदार असून अलीकडे महादेवराव महाडिकही ‘नमो’चा मंत्र म्हणताना दिसतात. याशिवाय अलीकडच्या काळात शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंग घाटगे यांनी भाजपमध्ये तर जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री विनय कोरे यांनी महायुतीत प्रवेश केला. खासदार संभाजीराजे यांचा वावरही भाजपशी संलग्न आहे.

चंद्रकांतदादांचे महत्त्व वाढले

मंत्रिमंडळाच्या द्वितीय स्थानी आलेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनेक प्रमुखांना भाजपच्या छताखाली आणण्यात यश मिळवल्याने त्यांचे राजकीय महत्त्व वाढीस लागले आहे.  पक्षातील इनकिमग बाबत ते म्हणाले, भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्याची गती पाहता काँग्रेसमुक्त जिल्हा होत असल्याचा आनंद आहे. पक्षाच्या वाढत्या ताकदीमुळे जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा लागलेला दिसेल. येत्या २-४ दिवसात आणखी काही प्रमुख पक्षप्रवेश करतील. तर, त्याचा कळसाध्याय २० जानेवारीला होणार असल्याचे सांगत मोठी असामी भाजपच्या मार्गावर असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना केला.