कोल्हापूरच्या विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव, पण उड्डाण कधी होणार?

करवीरनगरीत पहिली विमानसेवा सुरू करणारे छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव कोल्हापूरच्या विमानतळाला देऊन त्यांच्या कार्याचा उचित सन्मान राज्य शासनाने केला आहे. भावनिक मुद्दय़ाला हात घालून भाजपने जनतेची सहानुभूती मिळवली आहे. नामकरणाचा जल्लोष करणाऱ्या भाजपच्या शासनाने आता मात्र हवेतील विमान न उडवता प्रत्यक्ष विमान झेपावण्याची कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोकणाला जोडणाऱ्या शिवाजी पुलाचा प्रश्न संपला, असे अनेकदा शासनाकडून सांगून झाले; पण नव्या पुलाच्या अर्धवट बांधकामाची अवस्था जैसे थे आहे, अशी स्थिती विमानसेवा सुरू करण्याबाबत होऊ  नये याची दक्षता घेऊन कोल्हापूरला विकासाच्या मार्गावर आणण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका
220 former corporators of Kolhapur with the support of Shrimant Shahu Maharaj Chhatrapati
कोल्हापुरातील २२० माजी नगरसेवक श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या पाठीशी
Statue, Shivaji Maharaj, Assam,
आसाममध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा, चीनच्या सीमेवर २१ पॅरा स्पेशल फोर्समध्ये अनावरण, साताऱ्यातील सुपुत्राचा पुढाकार
Aurangzeb had changed the name of Pune to 'Muhiabad' after chatrapati shivaji maharaj death
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबानं पुण्याला दिलं होतं ‘हे’ नाव; जाणून घ्या इतिहास

१९३५ सालच्या दरम्यान छत्रपती राजाराम महाराजांनी उजळाईवाडीजवळ विमानतळासाठी १७० एकर जागा दिली. उजळाईदेवीवाडी येथून सुरू झालेला नावाचा प्रवास आता छत्रपती राजाराम महाराजांच्या नावापर्यंत येऊन ठेपला आहे. कोल्हापूरच्या भविष्याचा विचार करून त्यांनी हे पाऊल उचलले होते. विमान वाहतुकीसाठी त्यांनी पूर्णपणे मदत केली. राजाराम महाराजांच्याच हस्ते उद्घाटन झालेल्या या विमानतळावरून पहिले विमान आकाशात झेपावले. तो दिवस होता- ५ जानेवारी १९३९. त्यामुळेच त्यांना कोल्हापूर विमानसेवेचे जनक म्हणून ओळखले जाते. स्वाभाविकच, गेली अनेक वर्षे विमानतळाला त्यांचे नाव देण्याची मागणी घेऊन जनआंदोलने झाली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आणि छत्रपती घराण्याशी असलेले नाते आणखी दृढ करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नामकरणाचा दिलेला शब्द खरा करून दाखवला. त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव करून शब्दपूर्ती केली आहे. या नामकरणाला केंद्र सरकारकडून तत्त्वत: मान्यता यापूर्वीच मिळाली असून त्यांच्याकडून उर्वरित औपचारिकता पूर्ण होणे बाकी असून या कामात अडचणी येण्याची शक्यता दिसत नाही .

घोषणेचा भाजपला फायदा

छत्रपती घराण्याविषयी कोल्हापूरच्या जनतेत ममत्व आहे. हे जाणून राज्य शासनाने कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव दिले. याचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्नही स्थानिक भाजपने केला. मंत्रिमंडळाचा निर्णय घोषित होण्याचा अवकाश तोवर राजाराम महाराज यांच्या पुतळ्याजवळ घोषणाबाजी करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी साखर-पेढे वाटप करून निर्णयाचे श्रेय घेतले. जिल्ह्य़ातील अन्य खासदार-आमदार नामकरणासाठी प्रयत्नशील असताना भाजपने अचूक संधी साधत इतरांना शह दिला. शासनाचा निर्णय आणि श्रेयाचे प्रयत्न यामुळे भाजपला राजकीय लाभ मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडून तसे प्रयत्नही होणार, पण हे करताना कोल्हापूरची विमानसेवा लवकर आणि कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची जबाबदारीही निभावून न्यावी लागणार आहे. त्यासाठी त्यातील अडचणी दूर करण्यासाठी पावले पडण्याची गरज आहे.

वेळेचे गणित जमेना

कोल्हापुरात विमानसेवा सुरू होण्यातील अडचणी दूर करण्याला प्राधान्यक्रम देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. विमानसेवा सुरू होणार असली तरी विमानाची वेळ गैरसोयीची आहे. विमान कंपन्या देतात ती वेळ स्थानिकांना गैरसोयीची आहे.  हे विमान दुपारी येणार आणि सायंकाळी परत जाणार आहे. मुंबईच्या विमानतळापासून मंत्रालय व इतर शासकीय कार्यालये एक तासाच्या अंतरावर आहेत, त्यामुळे या विमानाने जाऊन काम करून परत येणे शक्य नाही. त्यामुळे विरोधकांकडून टोला लगावण्याची संधी सोडली जात नाही. नव्या विमानसेवेला प्रवासी मिळवून देण्याबरोबरच ही सेवा कायमस्वरूपी सुरू राहाणे ही जबाबदारी आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह श्रेय घेणाऱ्या दोन खासदारांवर आहे. त्यात हे तिघे यशस्वी झाले तर ते आणखी अभिनंदनाला पात्र राहतील, असे आमदार हसन  मुश्रीफ यांनी म्हणत विमानसेवेच्या श्रेयवाद आणि शाश्वत सेवेबद्दल शंका उपस्थित केली आहे.

निधीची घोषणा होऊनही..

गतवर्षीच्या केंद्रीय अंदाजपत्रकावेळी देशातील १६० बंद अवस्थेतील विमानतळांना भरीव आर्थिक मदत करण्याची घोषणा केली गेली. त्याचा कोल्हापूर विमानतळासाठी लाभ होऊन विमानसेवा सुरू होण्यास गती मिळाली. केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेतून ३१ शहरांना नव्याने हवाई नकाशावर आणले गेले. त्यापैकी १४ ठिकाणची सेवा प्रत्यक्षात सुरू झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी ४१ शहरे जोडली जाणार असून त्यात कोल्हापूरचा समावेश आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी २७४ कोटी रुपये खर्चाच्या विमानतळ विकास आराखडय़ाला मंजुरी दिली. मात्र, महाराष्ट्र शासनाने ८० कोटी रुपये खर्च करावेत, अशी अट घातली होती. त्यावर, विमानतळाच्या विकास आराखडय़ासाठी राज्य सरकार २० टक्के हिस्सा म्हणून ५५ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात मुंबईत केली होती. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी १ जानेवारीला विमानसेवा सुरू होईल, अशी घोषणा केली होती, पण ती हवेत विरली.

विमानसेवेची अधांतरी अवस्था

कोल्हापूर विमानसेवा २०१० पासून बंद आहे. २०११ साली काही काळ ती सुरू राहिली; पण नंतर ती बंद झाली. पावसाळ्यात उड्डाणासाठी कोल्हापूर विमानतळ अयोग्य असल्याने ते बंद ठेवण्यात आल्याचे कारण पुढे केले गेले. मागील आघाडी सरकारच्या काळात विमानसेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी हसन मुश्रीफ-सतेज पाटील या मंत्री द्वयीने प्रयत्न केले, पण त्यालाही माफक यश मिळाले. वायुदूत, एअर डेक्कन या कंपन्यांनी त्या वेळी सेवा सुरू केली, पण अपेक्षित प्रवासी न मिळाल्याने ही सेवा बंद पडली. त्यानंतर किंगफिशर एअरलाइन्ससाठी प्रयत्न झाले,पण ही कंपनीच अडचणीत आली. विमानतळ विस्तारीकरणाबाबत राज्य व केंद्र सरकारचे प्रयत्न केले. तथापि काही परवाने मिळत नसल्याने अडचणी येत आहेत.