ग्रामीण भागातील युवकांना मत मांडण्यासाठी व्यापक व्यासपीठ मिळत नाही. ‘लोकसत्ता’च्या ‘ब्लॉग बेन्चर्स’ने ही उणीव भरून काढली आहे. किंबहुना या उपक्रमामुळेच मला माझे मत मांडता आले आणि ते ‘लोकसत्ता’च्या रूपाने संपूर्ण राज्यभर गेले, असे मत या उपक्रमात द्वितीय क्रमांक मिळवलेल्या विनायक घोरपडे याने व्यक्त केले. त्याने ‘दे रे कान्हा’ या अग्रलेखावर ‘ब्लॉग’ लिहित स्पर्धेत भाग घेतला होता.
कोल्हापूरजवळील ‘जेनेसिस कॉलेज ऑफ टेक्नोलॉजी’मध्ये विनायक घोरपडे ‘मेकॅनिकल इंजिनिअरिंग’च्या द्वितीय वर्षांमध्ये शिकतो आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य एन. व्ही. पुजारी यांच्या हस्ते विनायकला स्पर्धेचे प्रमाणपत्र आणि पाच हजार रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले .
विनायक मूळचा आजरा तालुक्यातील उत्तूर गावाचा. या छोटय़ा खेडेगावात आधुनिक सुविधा खूपच कमी. लहानपणी तर वृत्तपत्र मिळणेही कठीण होते. तरीही त्याला वृत्तपत्र, मासिके वाचण्याचा छंद जडला. वाचकांच्या पत्रातून त्याने आजवर अनेक विषय मांडले आहेत. शिक्षण घेत असतानाच तो समीक्षात्मक लेखनही करू लागला. त्याच्या दोन्ही बहिणी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत. त्यांच्या आग्रहामुळे त्याला ‘लोकसत्ता’ वाचण्याची सवय जडली. यातूनच त्याने या स्पर्धेत भाग घेतला.
याबाबत विनायक म्हणाला, की मत मांडण्याची सवय असल्याने या स्पर्धेत भाग घेत मी या विषयावर माझी मते मांडली. स्पर्धेत भाग घेऊ शकतो याबाबत विश्वास होता. पण चक्क दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळेल असे वाटले नव्हते. कारण माझ्यासारख्या ग्रामीण भागातील युवकाचे मत इतके प्रभावी असेल आणि त्याला ‘लोकसत्ता’ सारख्या मान्यवर वृत्तपत्राकडून मान्यता मिळेल असे वाटले नव्हते. या बक्षिसामुळे आता माझा आत्मविश्वास वाढला आहे. बहिणीप्रमाणे स्पर्धा परीक्षेत उतरून यश मिळवण्यासाठी मला ‘लोकसत्ता’ हाच खरा आधार वाटत आहे. एखाद्या विषयावर ग्रामीण भागातील तरुण तपशीलवार विचार करतात, या तरुणांना हा उपक्रम नक्कीच मार्गदर्शक असल्याचेही तो म्हणाला.