दयानंद लिपारे

मराठी भाषिक आणि कन्नड रक्षक वेदिका ही संघटना यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. बेळगावसह सीमाभागांमध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातत्याने संघर्षाचे प्रसंग उद््भवत आहेत. कन्नडिंगाच्या हल्ल्याला शिवसेनेने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. येत्या शनिवारी पश्चिाम महाराष्ट्रातील कन्नड भाषकांची दुकाने बंद ठेवणारे आंदोलन जाहीर केले आहे, तर तिकडे कर्नाटकातील नेत्यांनी ‘बेळगाव हा कर्नाटकचाच भाग असल्याचे सांगत या प्रश्नी पंतप्रधानांनीही मध्यस्थी करू नये’ अशा विधाने करत महाराष्ट्रविरुद्धची गरळ सुरू ठेवली आहे.

बेळगावसह सीमावासीयांनी सातत्याने महाराष्ट्रात समाविष्ट होण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी अनेक वर्षे ते प्राणपणाने लढत आहेत. बेळगाव महापालिकेवरील भगवा ध्वज हटवला गेला. तेथे अलीकडे कन्नड रक्षक वेदिका संघटनेने कर्नाटकचा लाल-पिवळा ध्वज बेकायदेशीररीत्या लावला आहे. न्यायालयाने या ठिकाणी कोणताही ध्वज लावू नये, असे आदेश दिले असतानाही कन्नडिंगाची मनगटशाही सुरूच राहिली आहे. याविरोधात महाराष्ट्र मध्यवर्ती एकिकरण समिती व शिवसेनेने बेळगावमध्ये मोर्चा काढला. कोल्हापुरातील शिवसेना जिल्हा प्रमुखांनी बेळगावमध्ये जाण्याचा इरादा व्यक्त केला. पोलिसांनी रोखले तरीही गनिमी काव्याने त्यांनी कर्नाटकात जाऊन भगवा ध्वज फडकवला. यातून गेला महिनाभर क्रिया-प्रतिक्रिया, आरोप-प्रत्यारोप होत राहिल्याने सातत्याने संघर्ष झडत आहे

कन्नड भाषिकांनी मराठी भाषिकांवर जिल्हा प्रशासन व पोलिसांच्या मदतीने दडपशाही सुरू ठेवली आहे.

बेळगावचे जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या मोटारीवर, रुग्णवाहिकेवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यानंतर कोल्हापुरात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांनी कर्नाटक परिवहन मंडळाच्या गाड्यांना काळे फासले. वाहतूक बंद पडली. दुसऱ्या दिवशी कागल टोल नाक्यावर जाऊन कर्नाटकातील वाहनांवर ‘जय महाराष्ट्र’ फलक लावत वाहतूक महाराष्ट्रात करू नये, अशी आक्रमक भूमिका घेतली. याउपर जात शिवसेनेने २० मार्च रोजी पश्चिम महाराष्ट्रातील कन्नड भाषिकांची दुकाने बंद ठेवण्याचे आंदोलन हाती घेतले आहे. बेळगावात ‘मराठी भाषिक वाघ आहे’ असे स्टेटस मोबाइलवर ठेवल्याने कर्नाटक पोलिसांनी तिघा तरुणांना बेदम मारहाण केली. बेळगाव येथील शिवसेनेचे कार्यालय बंद करण्याची मागणी कन्नडिंगानी केली आहे. यामुळे मराठी-कन्नड भाषिकांतील सामना वाढत असून बेळगाव व कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा धगधगत आह

शिवसेना कार्यकर्त्यांनी कागल टोल नाक्यावर जाऊन कर्नाटकातील वाहनांवर ‘जय महाराष्ट्र’ फलक लावत वाहतूक महाराष्ट्रात करू नये, अशी आक्रमक भूमिका घेतली.  शिवसेनेने २० मार्च रोजी पश्चिम महाराष्ट्रातील कन्नड भाषिकांची दुकाने बंद ठेवण्याचे आंदोलन हाती घेतले आहे.