राज्यातील सत्ता गेल्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना धक्का बसला आहे, अशी टीका ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

तीन दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी दुचाकीवरून फिरणाऱ्या मुश्रीफ यांच्याकडे साखर कारखाना काढण्यासाठी संपत्ती कुठून आली, असे विचारणा करीत त्यांच्यावर टीकास्त्र डागले होते.

आज मुश्रीफ हे कोल्हापुरात आल्यानंतर त्यांनी पाटील यांच्या विधानाचा समाचार घेतला. मुश्रीफ म्हणाले, राज्यातील सत्ता गेल्यामुळे चंद्रकांत पाटील यांना धक्का बसला आहे. त्यातून सावरण्याची ताकद त्यांना परमेश्वराने द्यावी, अशी मी प्रार्थना करतो.

गाडीचे चाक बदलण्याच्या आत महाविकास आघाडीची सत्ता जाईल, या चंद्रकांत दादांनी विधानावर मुश्रीफ यांनी, आम्ही गाडीला लोखंडी टायर लावली असल्याने तिला ती बदलायची बदलायची गरज उरणार नाही, अशी टिपणी केली.