शिवसेना पिछाडीवर; काँग्रेस-राष्ट्रवादी मौनात

मोठा गाजावाजा होत असलेल्या शिवस्मारक भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम शासकीय स्वरूपाचा असला तरी त्यावर भाजपची लक्षणीय छाप पडली आहे. शिवनामाचा जप ओढणारी शिवसेना ‘बॅकफूट’वर गेली आहे. सत्तेतील अन्य मित्रपक्षासह विरोधी पक्ष तर केवळ नावापुरते उरले आहेत. हा कार्यक्रम भाजपचाच वाटावा अशा प्रकारचे नियोजन भाजपने केले असून त्यामध्ये कसलीही कमतरता राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेतल्याने लोकांतही हा कार्यक्रम भाजपाचाच असल्याचा संदेश गेला आहे.

शिवाजीमहाराजांचे भव्य स्मारक होण्याची चर्चा महाराष्ट्रात अनेक वष्रे सुरू आहे. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीतही याबाबत अनेक घोषणा झाल्या. पण त्याचा पाठपुरावा करत त्याला मूर्त रूप भाजप – सनेच्या काळात येत आहे. २४ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या स्मारकाचे भूमिपूजन होणार आहे. त्याची शासकीय पातळीवर नियोजनाला गती मिळाली आहे. हा कार्यक्रम शासकीय असला तरी त्याच्या नियोजनाची सूत्रे पूर्णत: भाजपकडे आल्याचे चित्र जिल्हास्तरापासून ते गावपातळीवरील या पक्षाच्या हालचालीतून स्पष्टपणाने दिसत आहे.

या एकाच कार्यक्रमाची वेळोवेळी पत्रकार परिषदेतून माहिती देण्याची घाई जिल्हा, तालुका, गाव पातळीवर काहींना काही कार्यक्रम घडवून आणण्याचे नियोजन, त्यासाठी प्रसिद्धी तंत्राचा वापर, ‘समाजमाध्यमा’त नावीन्यपूर्ण संदेश पेरण्याची कल्पकता, नरेंद्र – देवेंद्रांची छाप पडेल याची घेतलेली दक्षता, खास आराम बसद्वारा कार्यकत्रे- लोकांना मुंबईला नेण्याची सोय, गावागावांतून निघालेले गडकोटांवरील पाण्या- मातीचे कलश अशा नानाविध माध्यमाद्वारे भाजपने शिवस्मारकाचा प्रकल्प आपणच राबवत असल्याचे लोकांच्या गळी उतरण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे.

भाजपची सत्तेतील प्रमुख सोबती असलेली शिवसेना शिवरायांचा कार्यक्रम असतानाही केवळ औपचारिक पद्धतीने यामध्ये सहभागी झाली आहे. एरवी, शिवाजीमहाराज म्हणजे जणू सेनेची मालकी असा एक समज लोकांत आहे. शिवसेनेचा कोणताही कार्यक्रम म्हटला की शिवरायांना अभिवादन आणि ‘जय शिवाजी – जय भवानी’ या घोषणा ठरलेल्या. पण, सत्तेतील हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष या कार्यक्रमात पाहुण्यासारखा वावरत आहे. शिवरायांबाबतची सेनेची ‘सक्रियता’ या कार्यक्रमाबाबत तरी दुरावली आहे. भाजपने हा कार्यक्रम ‘हायजॅक’ केल्याची सल सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बोलण्यातून जाणवते. अन्य मित्रपक्ष तर या नियोजनाच्या आसपासही दिसत नाहीत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवस्मारक प्रकल्पाचे यश काँग्रेस पक्षाचा असल्याचा दावा करवीरनगरीत नुकताच केला. परंतु, सध्या सुरू असलेल्या घडामोडीत काँग्रेसची छाप उमटावी यासाठी कसलेही प्रयत्न झाले नाहीत. भाजपच्या श्रेयवादावावर तोंडसुख घेणे यापेक्षा काँग्रेसजनांच्या हातात सध्यातरी दुसरे काही नाही. अशीच काहीशी अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे श्रेय भाजपच्या खात्यावर जमा  होत असल्याचे स्थानिक पातळीवर दिसत आहे.