कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी पावसाचे जोरदार आगमन झाले. जिल्ह्याच्या सर्व भागात पाऊस  पडल्याचे वृत्त आहे. धरण, नदी, नाले यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे. येथील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यात सोमवारी दिवसभरात पाणी पातळी २ फूट वाढली आहे.

जुल महिन्यात जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला होता. सलग आठवडाभर पडलेल्या पावसाने सर्व नद्यांना पूर आला होता. धरणातील पाणीसाठा मोठय़ा प्रमाणात वाढला होता. त्यानंतर जवळपास ३ आठवडे पावसाने विश्रांती घेतली होती.

अधूनमधून तुरळक सरी कोसळत होत्या इतकेच. पण सोमवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली. जोरदार सरी सातत्याने बरसत राहिल्या. काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले.

छत्री, रेनकोटचा आसरा घेत नोकरदार, विद्यार्थी, लोकांना घराबाहेर पडावे लागले. पावसाच्या सरी कोसळत राहिल्याने महापालिकेच्या नियोजनाचा पुन्हा बोजवारा उडाला. रस्त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यांना पुन्हा तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले.  अशा रस्त्यातून मार्ग काढणे पादचारी व वाहनधारकांना कठीण बनले होते.  पावसाचा जोर कायम राहिल्याने राजाराम बंधाऱ्यात २ फूट पाणी वाढले . सकाळी १३ फूट असणारी पाणी पातळी सायंकाळी ७ वाजता १५ फूट इतकी होती. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ११.१८ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत एकूण १०९८२.५२  मि. मी. पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पाऊस मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे- करवीर ५.१८, कागल ८.४२, पन्हाळा १०.००, शाहुवाडी २०.००, हातकणंगले २.५०, शिरोळ  १.८५, राधानगरी १३.१७, गगणबावडा ४२.५०, भूदरगड ९.८०, गडिहग्लज ३.६०, आजरा ८.५० व चंदगड ८.६६ अशी एकूण १३४.१८ मि.मी. पावसाची नोंद झाली.