केंद्रीय पथकाचा मुद्दा आरोग्य मंत्र्यांनीच धुडकावला

कोल्हापूर: ‘कोल्हापुरातील करोना परिस्थिती गंभीर नाही,’ हा केंद्रीय पथकाचा मुद्दा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी धुडकावून लावला. ‘कोल्हापूरची परिस्थिती गंभीरच आहे’, असा उल्लेख करून टोपे यांनी ती नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या असल्याचा दावा शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

कोल्हापूर जिल्ह्यातील करोना रुग्ण संख्या व मृत्यू संख्येमध्ये होणारी सततची वाढ याचा आढावा जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतल्या नंतर केंद्रीय आरोग्य पथक प्रमुख, राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी कोल्हापुरातील परिस्थिती गंभीर नसल्याचे अधोरेखित केले होते. केंद्रीय पथकाच्या मताशी सहमत आहात का? असा प्रश्न येथे उपस्थित केला असता टोपे यांनी आपण सहमत नाही असे म्हणत केंद्रीय पथकाचा मुद्दा धुडकावून लावला. करोनाच्या दुसऱ्या लाटेत कोल्हापूर जिल्ह्याात रुग्ण वाढीचे प्रमाण पहिल्या लाटेपेक्षा २८ टक्क्यांनी अधिक होते. राज्याच्या अन्य भागात ते त्याहून कितीतरी अधिक होते. आता कोल्हापुरातील परिस्थिती काही प्रमाणात कमी होत आहे; मात्र धोका टळलेला नाही. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊ न उपाययोजना करण्याचे सूतोवाच केले आहे. त्यादृष्टीने कोल्हापुरात आवश्यक ती उपाययोजना, कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.