गतवर्षी १६ लाखांपेक्षा जास्त भाविकांनी करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिराला भेट दिली. त्यानुसार या वर्षीही गर्दीचे नियोजन केले जाणार असल्याचे मंदिर व्यवस्थापनाने सांगितले. आगामी शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीसंदर्भात नियोजन करण्याच्या उद्देशाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे महालक्ष्मी मंदिराशी निगडित घटकांबरोबर नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार आदी उपस्थित होते. अध्यक्ष जाधव म्हणाले, नवरात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी विविध घटकांच्या बैठका घेण्यात आल्या. त्यामध्ये महापालिका, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, श्रीपूजक, सेवेकरी संस्था यांचा सहभाग होता. संबंधित संस्थांना स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, नऊ दिवसांतील विविध पूजा, गर्दीचे नियोजन, सांस्कृतिक कार्यR म याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या वर्षीही गर्दीचे नियोजन केले आहे. मंदिराच्या चारही बाजूने सुसज्ज वाहनतळ व्यवस्था करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ललिता पंचमी आणि दसऱ्याच्यादिवशी देवीची पालखी निघते. गेल्या काही वर्षांत या पालख्यांना उशीर होत आहे. या वर्षी उशीर होणार नाही, याची दक्षता घेणार आहोत. नवमीला ‘व्हीआयपी दर्शन’ बंद नवरात्रोत्सव काळात देशभरातील व्हीआयपी (अति महत्त्वाच्या व्यक्ती) मंडळी महालक्ष्मी मंदिरात येतात. उत्सवातील अष्टमीच्या दिवशी समितीकडून सर्व प्रकारचे व्हीआयपी दर्शन बंद ठेवले जाते; परंतु या वर्षीपासून नवमीच्या दिवशी व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद ठेवणार असल्याची माहिती सचिव विजय पोवार यांनी दिली.