पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी आल्यानंतर छोटय़ा चलनामध्ये निर्माण झालेल्या टंचाईला माणदेशी महिला सहकारी बँकेचा आधार मिळत आहे. छोटय़ा घटकांकडून अगदी चिल्लर स्वरूपात बँकेने जमा केलेले हे धन आता चलन टंचाईच्या काळात समाजाच्या उपयोगाला येत आहे.सातारा जिल्ह्य़ातील दुष्काळी भाग असलेल्या माण, खटाव परिसरात ही माणदेशी महिला सहकारी बँक कार्यरत आहे. वर्षांनुवर्षांचा दुष्काळी भाग, शेती केवळ चारमाही, रोजगाराच्या अत्यंत कमी संधी यामुळे या भागातील आर्थिक उलाढालही तशी मर्यादितच आहे. कष्टकरी, मजूर, छोटे शेतकरी, कुटीर गृहोद्योग करणाऱ्यांची संख्या या भागात मोठी आहे. या परिसरातील महिलांना बचतीची सवय लावण्यासाठी बँकेने त्यांचे खूप मोठे जाळे विणले आहे. बचत आणि ठेवीतून निर्माण झालेला निधी पुन्हा या भागातील अन्य महिलांना कर्ज रूपात द्यायचा. आज १० हजारांहून अधिक महिला या बँकेच्या खातेदार आहेत. या सर्व महिलांकडून रोज छोटय़ा छोटय़ा स्वरूपाच्या रकमेतील बचत, ठेव या बँकेत जमा केली जात आहे. हे चलन आहे अगदी १० रुपयांपासून ते १०० रुपयांच्या पटीत. यामुळे या बँकेकडे या चलनामध्ये लाखोंची ठेव जमा झाली आहे. पाचशे-हजारच्या नोटा रद्द होताच सगळय़ांचे लक्ष हे १० ते १०० रुपयांच्या नोटांकडे वळाले आहे. कुठलाही व्यवहार हा या विशिष्ट चलनातच होत असल्याने १०० रुपयाखालील प्रत्येक चलनास मोठे महत्त्व आले आहे. या साऱ्यांवर काही प्रमाणात ‘माणदेशी बँके’चा हा सुटय़ा पैशांचा साठा आता उत्तर ठरला आहे. बँकेच्या अध्यक्ष चेतना सिन्हा, मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कुलकर्णी यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे. या बँकेकडे आज सुमारे ५० लाखांपर्यंतची रोकड ही सुटय़ा पैशांमध्ये उपलब्ध आहे. बँकेने ही सर्व रक्कम सातारा जिल्ह्य़ाच्या दुष्काळी भागात, छोटय़ा शहरांमध्ये, आठवडी बाजारात ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये अगदी १, २ रुपयांची नाणी देखील आहेत. १ रुपयांच्या पाचशे नाण्यांची थैली तयार करायचीआणि ती पाचशे रुपये म्हणून वापरायची. दुसरीकडे कुणी नवी बँकेने असे या छोटय़ा छोटय़ा पैशांच्या थैल्या केल्या आहेत. दहा, वीस रुपयांच्या नोटांचे गठ्ठे बांधले आहेत. बँकेने उपलब्ध केलेले हे पैसे कुणीही जुने चलन देऊन घेऊ शकते.