कोल्हापूर : इचलकरंजीमधील एका उद्योजकाचा खून झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. अशोक सत्यनारायण छापरवाल असे या व्यक्तीचे नाव आहे. आर्थिक व्यवहारातून ही घटना घडली असल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.पोलिसांनी तपास पथके पाठवली असून लवकरच संशयित हाती लागतील असे सांगण्यात आले.

इचलकरंजीपासून जवळच असलेल्या तारदाळ (ता. हातकणंगले) येथील रेल्वे फाटकानजीक या युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला आहे. त्याच्या मानेवर, अंगावर वार करण्यात आले आहेत. याची माहिती मिळताच घटनास्थळी हातकणंगले पोलीस दाखल झाले आहेत. छापरवाल यांच्या खुनाचे अजून समजू शकले नाही. मात्र आर्थिक व्यवहारातून ही घटना घडली असल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

इचलकरंजी येथील महेश कॉलनी परिसरात छापरवाल कुटुंबीय राहतात. कापड निर्मिती आणि विक्री क्षेत्रातील हे बडे प्रस्थ आहे. अशोक यांचाही अत्याधुनिक यंत्रमागचा मोठा कारखाना आहे. शर्टिग, सुटिंग कापडाचे ते नामांकित व्यापारी आहेत. त्यांची उलाढाल मोठी आहे. यातूनच त्यांच्यावर हल्ला झाला असावा,असा प्राथमिक निष्कर्ष आहे.

काल दुपारपासून अशोक यांचा संपर्क होत नव्हता. त्यामुळे रात्री उशिरा त्यांचे कुटुंबीय शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार देण्यासाठी गेले होते, त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला होता. आज सकाळी तारदाळ भागात त्यांचा खून झाल्याचे आढळून आले. यामुळे वस्त्रनगरी इचालकरंजीच्या व्यापारी क्षेत्राला जबर धक्का बसला आहे.

दोन दिवस व्यवहार बंद

दुपारी इचलकरंजीतील व्यापारी तसेच प्रमुख राजकीय पक्षांचे नेते महेश सेवा समिती येथे जमले. त्यांनी व्यापाऱ्यांचा खून होण्याच्या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत खुन्यांना पकडण्याची मागणी केली. त्यांना पकडले जात नाही तोवर दोन दिवस सर्व व्यवहार  बंद ठेवण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला. आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, आरोपीना शोधायचे काम सुरू असून दोन दिवसांत त्यांना ताब्यात घेतले जाईल. अतिरिक्त पोलीस अधीक्षक घाटगे यांनी आरोपीच्या मागावर आहोत, त्यांना लवकरच अटक केली जाईल. अशी घटना घडल्यावर एकत्र येता तसेच कोणी बळजबरी करत असेल, तर तेव्हाही एकजूट करण्याची आवश्यकता आहे.