दयानंद लिपारे

नव्या अध्यक्षाची उद्या निवड

राज्यातील सर्वात मोठा दूध संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या नव्या अध्यक्षाची सोमवारी निवड होणार आहे. २२०० कोटींची उलाढाल असलेल्या आणि बहुराज्य दर्जा मिळवण्याच्या तयारीत असलेल्या या संघाला तितकाच तोलामोलाचा अध्यक्ष लाभावा अशा भावना व्यक्त होत आहेत.

मावळत्या अध्यक्षांच्या निस्तेज कारकिर्दीमुळे गोकुळच्या लौकिक घसरत गेला. केवळ ‘होयबा’ या निकषाला उतरलेले नेतृत्व मिळाले की दर्जा असूनही कसे झगडावे लागते हे गेल्या तीन वर्षांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा दाखवून देण्यास पुरेशा ठरतात. त्यामुळे ‘रबर स्टॅम्प’च्या पलीकडे जाऊन दुग्धव्यवसाय कळलेल्या संचालकाकडे जबाबदारी सोपवली तर गोकुळच्या घसरण थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूरच्याच नव्हे तर राज्यातील दूध व्यवसायात गोकुळचे (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ) स्थान अनन्यसाधारण आहे. गोकुळच्या दूध आणि  दुग्धजन्य पदार्थांनी दर्जा सिद्ध केला आहे. पंचगंगा काठच्या दुधाने मुंबई, पुणेसह राज्यातील महानगरातील ग्राहकांना आकर्षित केले आहे. लौकिक असूनही गोकुळच्या वाटय़ाला श्रेयापेक्षा अपश्रेय अधिक वाटय़ाला आले आहे. याला गोकुळच्या नेतृत्व ,कारभारम्य़ांचा खाबूगिरीचा कारभार जसा कारणीभूत ठरला, तद्वत गोकुळच्या मिळालेल्या अध्यक्षपदाची  निष्क्रियता नडली.

दिवंगत आनंदराव पाटील असोत की अरुण नरके या अध्यक्षांनी गोकुळला सर्वतोपरी लौकिक मिळवून दिला. दुधाचा महापूर आणत संघाची तिजोरी भक्कम केल्याने संघात खऱ्या अर्थाने ‘गोकुळ’ नांदू लागले. यामागे त्यांचा दूध व्यवसायाचा व्यासंग महत्त्वाचा ठरला. या व्यवसायातील बारकावे, भविष्यातील संधी—आव्हाने यांना भिडण्याची क्षमता त्यांनी अभ्यासातून प्राप्त केली होती. पुढे या पदावर आलेल्या अर्धा डझनभर अध्यक्षांनी त्यात आपल्यापरीने भर घालण्याचा प्रयत्न केला, पण पूर्वीची उंची गाठता आली नाही. मावळत्या नेतृत्वाने तर त्यावर कडी केली. कारभाऱ्यांची पसंती या एकाच निकषावर विश्वास पाटील यांच्याकडे अध्यक्षपद सोपवले. त्यांच्याच काळात संघ बहुराज्य होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला. पण यात त्याचे श्रेय कमी आणि कारभाऱ्यांचेच अधिक होते.

गोकुळ दूध संघातील गैर कारभाराचे अनेक मुद्दे विरोधी गटाचे नेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित करून लढा पुकारला. गेल्या तीनही वार्षिक सर्वसाधारण सभेत पाटील यांनी सत्ताधारम्य़ांचे वस्त्रहरण करण्याचा पवित्रा घेतला. तेव्हा त्यास ठासून विरोध करून संघाचे बलस्थान सभासद—लोकांसमोर आणण्याची संधी असतानाही ती विश्वास पाटील यांनी गमावली. गंभीर प्रसंगीही सुहास्य हेच त्यांचे उत्तर ठरलेले असायचे. अभ्यासाला जणू सोडचिट्ठी दिल्यासारखे चित्र गेल्या साडे तीन वर्षांत अनेकदा दिसले.

उलट, बिकट प्रसंगी किल्ला लढवण्याची जबाबदारी महादेवराव महाडिक आणि पी.एन.पाटील या माजी आमदारांना पार पाडावी लागली. बाका प्रसंग आला की कारभारम्य़ांनी झुंज द्ययची आणि संचालकांनी सत्तेचे लोणी मटकवायचे, असा प्रकार होऊ  लागल्याने कारभाऱ्यांतही सडेतोड उत्तर दिले जात नसल्याने नाराजी होती.

अशातच संघातील बहुतेक संचालकांनी ‘गोकुळ’च्या  अध्यक्षपदावरून विश्वास पाटील यांना हटवावे, अन्यथा बंडाचा इशारा देणारी मोहीम राबवली.त्यातील परिणामकारकता जाणवल्याने अखेर कारभारम्य़ानी पाटील यांना राजीनामा देण्यास भाग पडले. गोकुळच्या इतिहासात अशी मानहानी अखेर प्रथमच होताना दिसली.

इच्छुकांची मोर्चेबांधणी

आता नवा अध्यक्ष निवडण्याचे निश्चित झाले असून सोमवारचा मुहूर्त मुक्रर झाला आहे. अध्यक्षपद मिळवण्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी लावली आहे.यामध्ये  रवींद्र आपटे, अरुण डोंगळे व रणजितसिंह पाटील या पूर्वी हे पद भूषवलेल्यांसह धैर्यशील पाटील या युवा चेहऱ्याचा समावेश आहे. नवा अध्यक्ष निवडताना आगामी लोकसभा— विधानसभा निवडणुकीची गणिते कारभारम्य़ाकडून घातली जाणार आहेत. मात्र, गोकुळचा लौकिक ,बहुराज्याचे आव्हान, अमूल सारख्या भारदस्त स्पर्धकांना भिडण्याची तयारी, म्हैस दूध कमी होऊ न तोटय़ाला कारणीभूत होणारे गाईचे वाढणारे दूध याची आर्थिक सांगड घालणे अशी अनेक आव्हाने पेलण्यास सक्षम ठरणारे नेतृत्व गोकुळ संघाच्या ठायी यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.