श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे सन २०१६-१७ मध्ये होणा-या कन्यागत महापर्वकाळासाठी निधी कमी पडू देणार नाही. सर्व मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देऊ, मात्र विकासकामांमध्ये राजकारण न आणता सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
कन्यागत महापर्वकाळच्या नियोजनाबाबत श्रीक्षेत्रनृसिंहवाडी येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बठक झाली. कुंभमेळ्याच्या धर्तीवर श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे दर १२ वर्षांनी होणा-या कन्यागत महापर्व काळासाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजनआराखडा येत्या आठ दिवसांमध्ये सादर करावा. त्याचा एकत्रित आराखडा तयार करुन शासनाकडे प्रामुख्याने पर्यटन विभागाकडे सादर केला जाईल. मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करुन मोठ्याप्रमाणात निधी आणला जाईल. कन्यागत महापर्वकाळासाठी शासन निधी कमी पडू देणार नाही. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, संरक्षण, प्रसिध्दी, पाìकग, आपत्ती व्यवस्थापन या सर्व बाजूंनी उत्तमात उत्तम सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. विकासाच्या सर्वअपेक्षा पूर्ण केल्या जातील,असे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, विकासकामांमध्ये राजकारण न आणत सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. नकारात्मक भूमिका बदलून काम केल्यास जिल्ह्याचा उत्कर्ष साधता येईल. त्यासाठी वृत्ती बदलणे आवश्यक आहे.
खासदार राजू शेट्टी म्हणाले, गर्दीचा ताण पोलीस विभागावर मोठ्या प्रमाणात येतो, वाहतुकीवर ताण येतो हे टाळण्यासाठी पाìकग व्यवस्था आवश्यक आहे. पुढीलवर्षी जादा पर्जन्यमानाची शक्यता गृहीत धरुन पर्यायी रस्त्यांची व्यवस्था करावी लागेल. श्री क्षेत्र नृसिंहवाडी देवस्थानाबरोबर परिसरातील ग्रामपंचायतींनाही पायाभूत सुविधा द्याव्या लागतील.
कर्नाटकचे खासदार प्रकाश हुक्कीरे म्हणाले, कृष्णा नदीवर चंदूर टेक ते सनिक टाकळीपर्यंत १९ कोटी रुपयांचा पूल कर्नाटक सरकार बांधत आहे. त्यासाठी लागणा-या संलग्न रस्त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून १० गुंठे जमीन आवश्यक आहे, ती देण्यात यावी. कर्नाटकातून श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे अनेक भाविक येतात. या ठिकाणी यात्री निवास बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जागा द्यावी.