स्वागत कमान लावण्याच्या कारणावरून येथील शिवाजी पेठेतील दोन मंडळांमध्ये शनिवारी सकाळी तुफान दगडफेक झाली. यामुळे उभा मारुती चौकात वातावरण तणावपूर्ण बनले होते. दरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. दोन्ही तरुण मंडळाच्या १० कार्यकर्त्यांना जुना राजवाडा पोलिसांना ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. शिवाजी पेठेतील महाकाली तालीम मंडळाच्या गणपतीशेजारीच संध्यामठ तरुण मंडळाचा गणपती बसवला जातो. शनिवारी रात्री महाकाली तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रंकाळ्याकडील बाजूस स्वागत कमान उभी केली होती. यावेळी संध्यामठ तालमीच्या कार्यकर्त्यांनी यास आक्षेप घेतला. कमान उभी करायची नाही यातून दोन्ही मंडळाचे कार्यकत्रे आमने सामने आले. दोन्ही तालमीच्या ज्येष्ठ मंडळींनी हा वाद शनिवारी रात्रीच मिटवला होता. मात्र सकाळी काही अज्ञातांनी या स्वागत कमानीचे फलक फाडले यामुळे संध्यामठ गल्लीतील वातावरण तणावपूर्ण बनले होते. महाकाली तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. याचा जाब विचारण्यासाठी तालमीच्या कार्यकर्त्यांंनी संध्यामठ तालमीकडे धाव घेतली. यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. शेजारीच सुरू असणाऱ्या बांधकामाच्या ठिकाणावरील विटा, दगड फेकून मारण्यास सुरुवात झाली. दोन्ही तालमीच्या ज्येष्ठ मंडळींनी तालमीच्या कार्यकर्त्यांना शांत केले. दरम्यान जुना राजवाडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जमावास पांगवले व परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.