ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या संशयित समीर गायकवाड याच्यावरील आरोपपत्राची सुनावणी बुधवार (२७ जुल ) पर्यंत लांबणीवर पडली. आरोपपत्राबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सोमवार (दि. २५) रोजी असल्याने जिल्हा न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्याचे आज येथे दिसून आले. ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी समीर विष्णू गायकवाड ( सांगली) याला अटक केली होती. त्याच्यावर दोषारोपपत्रही न्यायालयात दाखल केले होते. समीरचे जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर समीरच्या वकिलांनी समीरवर आरोपपत्र करण्याची मागणी केली होती. मात्र तपासाबाबत असमाधान व्यक्त करत समीर विरोधात ठोस पुरावे नसल्याचे सांगून समीरवर आरोपपत्र दाखल करु नये, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली होती. याबाबत उच्च न्यायालयात पुढील सुनावणी २५ जुल रोजी होणार आहे. याच सुनावणीचा दाखला देत सरकारी वकील अॅड. चंद्रकांत बुधले यांनी मंगळवारी न्यायालयात समीरवर चार्जफ्रेम बाबत सुनावणी पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी ही मागणी मान्य करत आरोपपत्राबाबतची पुढील सुनावणी २७ जुल रोजी घेण्यात येणार असल्याचे सांगितले. समीर गायकवाडचे वकील अॅड. समीर पटवर्धन यांनी समीरला कारागृहात सनातनचे साप्ताहिक वाचण्यासाठी देण्यात यावे अशी मागणी केली. बिले यांनी ही मागणी मान्य केली. पुणे येथील एक साप्ताहिकाने सनातन संस्थेच्या रामनाथी, फोंडा येथील आश्रमांवर छापे पडल्याचे वृत्त छापले होते. या छाप्यातील कागदपत्रे पोलिसांनी द्यावीत अशी मागणी समीर पटवर्धन यांनी न्यायालयात केली. यावर न्यायाधीश एल. डी. बिले यांनी याबाबत आपणास काही माहिती नसून मुंबई येथून माहिती घ्यावी असे सांगितले.