कॉ.गोिवद पानसरे यांच्या खून प्रकरणाच्या तपासामध्ये राज्य शासनाकडून तपास यंत्रणेवर दबाव येत असल्याचे जाणवत आहे. यामुळे हा तपास केंद्रीय गुन्हा अन्वेषण पथकाकडे (सीबीआय) सोपवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली.
पानसरे खूनप्रकरणी सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याला पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केल्यानंतर विखे यांनी शनिवारी पानसरे कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी पोलिस तपासाबाबत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, हीना बोरा खून प्रकरणात गुन्ह्याची कबुली मिळाली असतानाही या प्रकरणाचा तपास शासनाने घाईघाईने सीबीआयकडे सोपवला आहे. मात्र, दाभोळकर, पानसरे यांसारख्या विचारवंतांचा खून होऊनही त्याचा तपास सीबीआयकडे सोपवला जात नाही. राज्य शासनाची तपासाबाबतची भूमिका दुटप्पी आहे असा आरोप त्यांनी केला.
सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव आघाडी शासन काळात बनवण्यात आला होता. अशा प्रकारचे धाडस भाजपाचे सरकार दाखविणार का, असा प्रश्न उपस्थित करुन विखे यांनी सनातन संस्थेच्या दबावाखाली मुख्यमंत्री असल्याचा आरोप केला. तथापि, सनातन बंदीबाबत सुशीलकुमार िशदे व पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका परस्परविरोधी असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर विखे यांनी वरिष्ठ नेत्यांबाबत मत व्यक्त करण्यात आपण असमर्थ असल्याची कबुली दिली.
कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पानसरे यांचा खून झाल्यावर यामागे धार्मिक शक्ती कार्यरत नसल्याचे विधान केले होते. या राज्यसरकारला क्लिन चिट देण्याची सवय जडली आहे. मात्र, सनातनच्या साधकाला अटक केली गेली असल्याने पालकमंत्र्यांनी माफी मागावी. चुकीचे प्रायश्चित्त घेण्यासाठी त्यांनी सनातनवर बंदी घालण्याचा ठराव मंत्रीमंडळापुढे आणावा, अशी मागणी विखे यांनी केली.
विखे पिता-पुत्र म्हणजे भाजपाचे राखीव खेळाडू असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना विखे म्हणाले, विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पािठबा देऊन राखीव खेळाडू कोण आहे हे दाखवून दिले होते. विरोधी पक्षनेतेपद गेल्याचे दुख असल्याने राष्ट्रवादीकडून अशी निराशाजनक वक्तव्य होतात, असा टोला त्यांनी लगावला.