जंगली प्राण्यांच्या शिकारीसाठी गावठी बॉम्ब बनवणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली आहे. हातकणगले येथील माले मुडशिंगी गावात ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून गावठी बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि ६९ जिवंत गावठी बॉम्ब हस्तगत करण्यात आले आहे. १८ ऑक्टोबर रोजी उजळाईवाडी येथील उड्डाणपुलाखाली झालेल्या स्फोटाच्या अनुषंगाने संशयितांकडे चौकशी सुरु आहे.

विलास राजाराम जाधव आणि आनंदा राजाराम जाधव अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. दोघेही माले मुडशिंगीचे रहिवासी आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील उजळाईवाडी येथील उड्डाणपुलाखाली शुक्रवारी रात्री अज्ञाताने रस्त्यावर ठेवलेल्या वस्तूचा स्फोट होऊन ट्रक चालक दत्तात्रय गणपती पाटील यांचा मृत्यू झाला घटनेचे गांभीर्य तसेच विधानसभा निवडणूक पार्श्वभूमी लक्षात घेत पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देखमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, बाँम्ब शोधक व नाशक पथक आणि स्थानिक पोलीस यांची पथके तयार करुन लवकरात लवकर गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते.

या स्फोटाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष माने व हरिष पाटील यांना माहिती मिळाली होती की, विलास जाधव, आनंदा जाधव हे जंगली जनावरांच्या शिकारीसाठी राहत्या घरी गावठी बॉम्ब बनवून त्याची विक्री करत आहेत. पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली असता घरात गावठी बाँम्ब बनवण्याच्या साहित्यासह पांढऱ्या व गडद तपकिरी रंगाचे एकूण ६९ जिवंत गावठी बाँम्ब असा एकूण सुमारे ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

संशयितांकडे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी चौकशी केली असता, बॉम्ब बनवण्यासाठी सल्फर, पोर्टशियम पावडर, गारगोटीचे खडे यांचा वापर केल्याचे संशयितांनी सांगितले. बॉम्ब बनविण्यासाठी वापरलेले साहित्य कुठून आणले? तसेच बाँम्ब बनवल्यानंतर त्याचा वापर काय झाला आहे? तसेच कोणास विक्री केली आहे? याबाबत व उजळाईवाडी येथील स्फोटाच्या अनुषंगाने अधिक तपास सुरु आहे.