कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दर आंदोलन चिघळलं आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची जाळपोळ करण्यात आली. यामुळे नुकतेच सुरू झालेल्या साखर कारखान्यांच्या ऊस गाळपावर मोठा परिणाम झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दर आंदोलन चिघळल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विशेषतः शिरोळ व हातकंणगले तालुक्यात उसदराचे आंदोलन चिघळलं आहे. कर्नाटकमधील कारखानदारांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ऊस आंदोलनास हिंसक वळण लागल्याचं आंदोलकांकडून सांगण्यात आलं.

दरम्यान, शिरोळ तालुक्यातील दानोळी येथे कर्नाटकातील अथणी शुगर्सकडे ऊस वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर पेटवण्यात आला. तर सहा ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडून आंदोलकांकडून ऊस वाहतूक रोखण्यात आली. तसंच हातकंणगले येथे कर्नाटकातील बेडकीहाळ येथील व्यकंटेश्वरा कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडून आंदोलकांनी ऊस वाहतूक रोखली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शनिवारी जयसिंगपुर येथे ऊस परिषद होणार आहे. राजू शेट्टी घोषित करतील तो दर दिल्याशिवाय कारखाने सुरू करू नयेत, अशी आक्रमक भूमिका घेऊन संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.