मंगल कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी सनई चौघड्याचे मंजुळ स्वर आणि मंगलाष्टका म्हणताना ‘आली लग्न घटिका समीप’ हे शेवटचे चरण पूर्ण होण्याआधीच वाद्यांचा होणारा गजर यामुळे मंगलमय वातावरण निर्माण होते. करोना संसर्गामुळे मर्यादित लोकसंख्येत शुभमंगल करण्याचे आदेश असल्याने वाजंत्री शिवाय विवाह ‘समारंभ’ पार पडत होता. मात्र, आता ६ ते ७ वाजंत्रीच्या सुरेल संगीताच्या निनादामध्ये ‘नांदा सौख्यभरे’चा सोहळा होणार आहे. कोल्हापुरातून याची सुरुवात होणार असून जिल्हा प्रशासनाने सोमवारी हिरवा कंदील दर्शविला आहे. करोना संसर्गामुळे टाळेबंदी जाहीर केल्याने एकूणच जीवनमान – राहणीमान यामध्ये आमुलाग्र बदल झाला आहे. लग्नकार्य मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी दिल्याने लग्नाचा झगमगाट आणि विवाह नंतरची बँडवर दणक्यात निघणारी वरात हे चित्र सध्या दुर्मिळ बनले आहे. खरंतर सनई चौघड्यांशिवाय लग्ना कार्यात मजाच नाही. यामुळे किमान काहीतरी वाद्य या शुभप्रसंगी असावेत असे लग्नकार्य असणाऱ्या घरातून मागणी होती. त्यातच लॉकडाउनमुळे बेरोजगार वाजंत्री मंडळीच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही निर्माण झाला आहे. यातून समन्वयाचा मार्ग काढण्यासाठी कोल्हापूरचे आमदार चंद्रकांत जाधव प्रयत्नशील होते. त्यांनी लग्नकार्य कुटुंब आणि वाजंत्री या दोघांचेही मनोगत जिल्हा प्रशासनाला समोर मांडले. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाई यांनी सहा ते सात वाजंत्रीना लग्नकार्यात सहभागी होण्यास परवानगी दिली आहे, अशी माहिती आमदार जाधव यांनी सोमवारी दिली. यामुळे आता पुन्हा एकदा विवाह समारंभात उत्साह भरणार आहे. आमदार जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे वाजंत्री व्यवसायाला नवसंजीवनी मिळाल्याची प्रतिक्रिया कोल्हापूर जिल्हा घडशी समाज संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर पाहुणेमंडळींची संख्या होणार कमी लग्नकार्यातील एकूण ५० लोकांचाच समावेश असावा असे फर्मान असल्याने आधीच संयोजकांना पाहुणे, आप्तेष्ट, मित्रपरिवार यांच्या नावावर अनिच्छेने फुली मारावी लागत आहे. आता या शुभप्रसंगी जितके वाजंत्री उपस्थित राहतील तितके निमंत्रित लोक कमी करण्याची वेळही लग्नकार्य कुटुंबावर आली आहे.