कोल्हापूर : कोल्हापूर शहरात बुधवारी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काही प्रमाणात राहिला. पाऊ स कमी झाल्याने पाणी पातळी कमी होऊ  लागली आहे. जिल्ह्यात आज गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ३८ मिमी, तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी २.५७ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, शिपेकरवाडी गावात मंगळवारी रात्री मोठी दरड कोसळली.

कोल्हापूर जिल्ह्यात या आठवडय़ात चांगला पाऊस पडत आहे, पण त्यात सातत्य दिसत नाही. मध्येच एक—दोन दिवस पाऊ स उसंत घेतो किंवा त्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते. आज कोल्हापूर शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दुपार नंतर हलक्या , मध्यम सरी बरसत राहिल्या. पाणलोट क्षेत्रात पाऊ स पडत असला तरी गती कमी झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी २२ फुटांवरून १८ फूट इतकी कमी झाली असल्याचे आपत्ती निवारण विभागाने सांगितले. जिल्ह्यातील राधानगरी धरणात आज २.५९ टीएमसी पाणीसाठा होता. घटप्रभा मध्यम प्रकल्प काल दुपारीच पूर्ण क्षमतेने भरला आहे.

दरड कोसळली

करवीर तालुक्यातील शिपेकरवाडी गावात मंगळवारी रात्री मोठी दरड कोसळली. या ठिकाणी भूस्खलनाची स्थिती निर्माण झाली असून नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. दरड कोसळल्याने नागरिकांनी रात्र जागून काढली. ७०० लोकसंख्या असलेली ही वाडी डोंगराच्या कुशीत वसली आहे.

गावाच्या वरच्या बाजूला असलेला एक मोठा कडा कमकुवत झाला असून तो कोणत्याही स्थितीत कोसळून अर्धे गाव त्यामध्ये गाडले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तथापि, कोणतीही जीवित व वित्त हानी झालेली नाही. करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी घटनस्थळाला भेट दिली. गावकरम्य़ांशी संवाद साधला. सुरक्षेची सर्व खबरदारी घेतली आहे. संबंधित सर्व विभागांना त्वरित कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले असल्याचे संजय शिंदे यांनी बुधवारी सांगितले.