अश्विनी बिद्रे हत्याप्रकरण

नवी मुंबई येथील सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला देण्यात आलेले राष्ट्रपतिपदक परत घेण्याबाबत राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे, असे आश्वासन गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी शुक्रवारी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरावेळी  दिले.

मूळच्या हातकणंगले (जि. कोल्हापूर) येथील सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाच्या चौकशीविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य हेमंत टकले यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावरील चच्रेला उत्तर देताना मंत्री  पाटील म्हणाले, की गतवर्षी जुल महिन्यात बिद्रे बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. या प्रकरणी कुरुंदकर आणि त्याचा साथीदार कुंदन भंडारी, महेश फळणीकर यांनी आधी बिद्रे यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते वाशी खाडीत टाकले.

नौदलाच्या साहाय्याने मृतदेह अथवा त्यासंबंधीचे पुरावे शोधण्याचे काम चालू आहे. या प्रकरणी ३१ जानेवारी रोजी  कुरुंदकर याच्याविरुद्ध गुन्हा प्रविष्ट करण्यात आला. त्यानंतर जवळपास ११ महिन्यांनंतर ७ डिसेंबरला अटक करण्यात आली. त्यानंतर ८ दिवसांनी त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.  आता नियम पडताळून त्यांना बडतर्फ केले जाईल.