मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतीत  नारायण राणे यांनी बट्टय़ाबोळ केल्याचा प्रहार भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.  प्रकाश आंबेडकर यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला.

आंबेडकर म्हणाले, की मराठा समाजाला आरक्षण मिळण्यात अडचणी आहेत आणि यापुढे येत राहतील. नारायण राणे यांनी हा प्रश्न अडचणीचा करून ठेवला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील समितीने याबाबत केलेल्या चुकीच्या मांडणीमुळे हे आरक्षण मिळण्याऐवजी त्याचा बट्टय़ाबोळ करण्याचे काम केल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.

दरम्यान, धनगर समाजासाठी मात्र त्वरित आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी करत आंबेडकर म्हणाले, की धनगर समाजाने आरक्षणाबाबत सरकारकडे वारंवार मागणी करूनही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. हे आरक्षण देण्यासाठी नियुक्त  केलेल्या समितीने आता आपला अहवाल सादर करू  नये, असा सल्ला त्यांनी दिला.

या प्रश्नी २० मे रोजी पंढरपूर येथे आधिवेशन घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान कर्नाटक विधानसभेचा निकाल काहीही लागला तरी त्यानंतर भाजप मध्यावधी निवडणुका घेईल, असे भाकीतही आंबेडकर यांनी या वेळी वर्तवले.