नवीन वाशी नाका येथील मुख्य जलवाहिनीला लागलेली गळती, नरसिंह कॉलनीतील अनियमित पाणीपुरवठा, राजेंद्र नगरात गेली तीन वर्ष वाया जात असलेले पाणी, राजारामपुरी येथे पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे मिसळणारे पाणी अशा पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत महापालिका प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या हलगर्जीपणावरून शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेमध्ये सदस्यांनी टीकेची झोड उठवली. उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागलेली असताना पाणीपुरवठा विभागाच्या अकार्यक्षमतेवर बोट दाखवत सदस्यांनी कामकाजात तातडीने बदल होण्याची गरज व्यक्त केली.
फेब्रुवारीच्या अखेरीसच करवीरकरांना मे च्या उन्हाळझळा जाणवू लागल्या आहेत. तर, दुसरीकडे पाणीपुरवठय़ाच्या समस्यांनी हैराण झालेल्या नागरिकांनी नगरसेवकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. त्याचा परिणाम शुक्रवारी झालेल्या स्थायीच्या सभेत प्रखरपणे उमटला.
नवीन वाशी नाक्याजवळील मुख्य जलवाहिनीस मोठी गळती लागली असून असा प्रकार शहराच्या विविध ठिकाणी सुरू असल्याकडे मनिषा कुंभार, अजीत ठाणेकर, सभापती मुरलीधर जाधव यांनी लक्ष वेधले. यामुळे पाणी वाया जात असलेने गळती काढण्याची मागणी करताना शाखा अभियंता कुराडे भागाकडे फिरकत नाहीत, फोन उचलत नाहीत असे सांगत प्रशासनाचे वाभाडे काढले. यावर प्रशासनाने गळती काढण्यासाठी शहराचा पाणीपुरवठा तीन ते चार दिवस बंद ठेवावा लागणार असल्याचे सांगून त्याचे नियोजन करण्याचे तसेच कुराडे यांना सूचना देण्याचे आश्वासन दिले.
व्यापारी केंद्र असलेल्या राजारामपुरीतील नवव्या व दहाव्या गल्लीत पिण्याच्या पाण्यामध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे प्रतिज्ञा निल्ले यांनी सांगितल्यानंतर प्रशासनाने समक्ष पाहणी करू अश तीन शब्दात उत्तर देऊन बोळवण केली. राजेंद्रनगर बर्ड स्कूलजवळ पाण्यामध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळत असून वारंवार तक्रार करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याचे रूपाराणी निकम यांनी निदर्शनास आणून दिले. राजेंद्र नगर, सुभाषनगर येथे ओढय़ाच्या बाजूला रिटेिनग व्हॉल्वचे काम वर्षभरापासून बंद आहे. एका बाजूलाच काम करण्यात आल्याने नागरिकांच्या घरात पाणी जात असल्याची तक्रार निकम यांनी केल्याने प्रशासनाने याठिकाणी हद्दीबाबत वाद निर्माण झाला आहे. हद्द निश्चित करून काम पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले.
स्मार्ट सिटीचे वाभाडे
िरग रोड येथील नरसिंह कॉलनीमध्ये तीन ते चार वष्रे पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, अशी ध्क्कादायक माहिती दीपा मगदूम, रीना कांबळे यांनी दिली. स्मार्ट सिटीचा विचार केला जात असलेल्या या शहरात पाणी भरण्यासाठी नागरिकांवर ओढय़ावर जाण्याची वेळ ओढवली असल्याचे सांगत स्मार्ट सिटी नियोजनाचे वाभाडे काढले. या भागाची लोकसंख्या वाढल्याने अपुरा पाणीपुरवठा होत आहे. नवी पाईपलाईनसाठी निविदा काढण्याचे प्रशासनाने आश्वासन दिले.
तर ‘नेचर इन निड’ कंपनीला टाळे
शहरातील जैव वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रियेचे काम करणारी नेचर इन निड ही कंपनी विना परवाना शहराबाहेरही कचरा प्रक्रियेसाठी आणत आहे. महापालिकेच्या जागेवर कंपनीने आपले नाव लावले असून जागा भाडेही कंपनी भरत नाही. कंपनीचे काम काढून घेण्याची नोटीस आयुक्तांनी दिली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचे नातेवाईक भागीदार असल्याने कंपनी त्यांच्यावर कारवाई न झाल्यास कंपनीला टाळे ठोकण्याचा इशारा सत्यजित कदम, निलाफर आजरे यांनी दिला. कंपनीस काम बंद करण्याबाबत कळविण्याचे प्रशासनाने मान्य केले.