कोल्हापूर : शिरोळ तालुका १०० टक्के पूरग्रस्त जाहीर करावे, तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून पूरग्रस्तांना तत्काळ सानुग्रह अनुदान वितरित करावे, शेतीचे पंचनामे करून शेतीचे नुकसान भरपाई ही तत्काळ द्यावी यासह पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी शिरोळ तालुका पूरग्रस्त अन्याय निवारण समितीतर्फे कुरुंदवाड व शिरढोण गाव चावडी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. गुरुवारी निघालेल्या मोर्चात नागरिक व शेतकरी सहभागी झाले होते. भैरवाडी काळाराम मंदिर येथून मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून गाव कामगार तलाठी कार्यालया समोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. शिरोळ तालुका पूरग्रस्त अन्याय निवारण समितीतर्फे तालुक्यात महापूर आलेल्या ४५ गावांत पूरग्रस्त नागरिक व ग्रामस्थांना शासनाचा लाभ मिळावा, यासाठी गावागावात आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा समितीचे अध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी केली. दगडू माने, बाळासाहेब माळी, विजय पवार, डी.आर पाटील, विनोद पुजारी, सीताराम भोसले, रघु नाईक, दयानंद मालवेकर, विश्वास बालीघाटे, आप्पासाहेब बंडगर, आण्णासाहेब चौगुले आदींनी भाषणे केली.