राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना वेचून विविध प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न सत्ताधारी  करीत आहेत. राज्यातील सध्याचे सरकार सूड भावनेने वागत आहे. त्यामुळे आता हे सरकार लवकर गंगार्पण करण्याची वेळ आली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केली.
महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीदेखील सरकार सत्तेवर आले होते. पण त्यावेळच्या सरकारने विरोधी पक्षांच्या नेत्यांशी कधीही सूड भावनेने वर्तणूक ठेवली नव्हती. त्या सरकारच्या मनात सूडाची भावना नव्हती, असा उल्लेख करून मुश्रीफ यांनी विद्यमान सरकारच्या कामकाज पध्दतीवर टीका केली. सध्याचे सरकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सूडाच्या भावनेने वेचून वेचून विविध प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणूनच हे सरकार लवकरात लवकर गंगार्पण करण्याची वेळ आली आहे, असे यांनी या वेळी सांगितले.