रुकडीत शांतता; ५३ जणांना अटक, दीड हजार जणांवर गुन्हे दाखल भीमा-कोरेगाव घटनेवरून सलग दुसऱ्या दिवशी जातीय दंगल सुरू राहिल्यानंतर आता कोल्हापुरात पोलिसांनी अटकसत्र सुरू केले आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत रुकडीतील ४३ जणांसह ५३ जणांना अटक करण्यात आली. हल्लेखोरांना पकडण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. दरम्यान, ‘कोल्हापूर बंद’ काळात सार्वजनिक ठिकाणी दगडफेक, तोडफोड तसेच जमावाला चिथावणी दिल्याप्रकरणी दोनही गटातील प्रमुखांसह सुमारे दीड हजार जणांवर शहरातील चारही पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले असून ही एक विक्रमी संख्या मानली जात आहे. दगडफेक, तोडफोडीमध्ये सुमारे २५ लाखांचे नुकसान झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. भीमा-कोरेगाव येथे दंगल झाल्याचे पडसाद कोल्हापुरात उमटले. दोन दिवस हिंसक घटना होत राहिल्या. बुधवारी बंदच्या दिवशी तर समाजकंटकांनी धुडगूस घातला. अवघे शहर वेठीला धरले. वाहन, घरे, दुकाने यांची मोडतोड, जाळपोळ केल्याने आता लोकांनी पोलिसांत तक्रार देण्यास सुरुवात केली आहे. चिथावणी देणे, दगडफेक, तोडफोड केल्याप्रकरणी संशयितांवर राजारामपुरी पोलिस ठाण्यात चार, लक्ष्मीपुरीत दोन, जुना राजवाडा येथे तीन व राजारामपुरी ठाण्यात एक असे एकूण नऊ गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हा दाखल झालेल्यांत रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, अनिल म्हमाणे, अविनाश शिंदे, विश्वासराव देशमुख तसेच िहदुत्ववादी कार्यकर्त्यांत तानाजी पाटील, अमर झाड, विजय करजगार, शिवानंद स्वामी, सागर साळोखे, शरद माळी आदींचा समावेश आहे. पोलिसांनी अटकसत्र सुरू केले आहे. सायंकाळपर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे. शिवाय, नऊ पथके आरोपीचा शोध घेत आहेत, असे शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी सांगितले. रुकडीत शांतता भीमा-कोरेगाव घटनचे हिंसक पडसाद उमटत राहिल्याने संचारबंदी लागू केलेल्या रुकडी (ता. हातकणंगले) गावात दुसऱ्या दिवशीही तणावपूर्ण शांतता होती. दरम्यान दोन्ही गटांतील ४३ जणांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.