दुरावा संपला, पण संवादातील मनमोकळेपणाचा अभाव कायम राहिला.. हे चित्र होते दीड-दोन महिन्यांच्या अंतराने गुरुवारी करवीर नगरीत एकत्र आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत या दोन घनिष्ठ मित्रांतील मत्रीचे. कोणाच्या नजरेत भरू नये म्हणून तुरळक गप्पा झाल्या, पण पूर्वीचा दिलखुलासपणा त्यात नव्हता.

गेल्या दोन महिन्यांत खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील अंतर वाढत आहे. एकत्र यायचे ते जणू मारून-मुकटून आणल्यासारखे. महिन्यापूर्वी दोघे मित्र इस्लामपूर येथे झालेल्या एका सत्कार सोहळ्यावेळी एकत्र आले खरे; पण उभयतांनी मुखदुर्बळ राहणे पसंत केले. तेव्हाही उभयतांची देहबोली दोघांचे बदलते नाते स्पष्ट करणारी होती.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कर्जमुक्तीचा एल्गार छेडला आहे. त्याचा एक टप्पा आज कोल्हापुरातील मोर्चाने संपला. मोर्चाच्या तयारीसाठी शेट्टी कोल्हापूर-सांगलीचा भाग िपजून काढत असताना ‘सदाभाऊशिवाय चळवळ चालवता येते,’ अशा शब्दांत चिमटे काढत राहिले. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी नाते सांगणारे सदाभाऊ मंत्री झाल्यानंतर पक्षाच्या मोर्चाला येणार की नाही याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते.

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन धडकल्यावर सदाभाऊ मंचावर दाखल झाल्यावर टाळ्या पडल्या. ते भाषणाला उभे राहिल्यावरही कार्यकर्त्यांकडून प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून ते कर्जमुक्तीपर्यंत साऱ्या प्रश्नांचा पाठपुरावा कसा करत आहे, याचा आढावा त्यांनी घेतला. त्यानंतर मात्र त्यांनी वाघनखं बाहेर काढली. ‘‘मी शांत आहे, पण कमजोर नाही. सनिक असल्याने रणांगणात तलवार घेऊन आयुष्यभर लढण्याची तयारी असलेला सच्चा कार्यकर्ता आहे,’’ असे सांगत त्यांनी पक्षातील टीकाकारांना फटकारे लगावले.

सदाभाऊ खोत हे स्वाभिमानीच्या सर्व व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमधून बाहेर पडले होते. हा संदर्भ घेत त्यांनी ‘मी काळ्या  आईची माती कपाळाला लावून पक्षकार्य करणारा कार्यकर्ता आहे, फेसबुकवरील वरवरचा नाही’ असे म्हणत त्यांनी समाज माध्यमातून लक्ष्य करणाऱ्यांना टोला लगावला. तर, शेट्टी यांनीही ‘आगामी लढा हा कोणी  सोबत येवो वा ना येवोत एकटय़ाने लढणार आहे,’ असे सांगत द्यायचा तो इशारा सदाभाऊंना दिला.

सुमारे, अर्धापाऊण तासाची ही शेट्टी-खोत यांची भेट. पण पुलाखालून किती पाणी निघून गेले आहे याचे दर्शन घडवणारी. म्हटले तर दोघांत गप्पा होत्या पण नीट पहिले तर संवादातील सूर हरवला होता. लवकरच पुण्यातून सुरू होणारया आत्मक्लेश यात्रेत ते सहभागी होणार का, असा प्रश्न निर्माण करूनच ही भेट संपली असली, तरी पुढे काय घडणार याची उत्सुकता मात्र या भेटीने निर्माण केली, हेही तितकेच खरे.