ठेच लागली म्हणून पायाचा अंगठा कापून ठेवायचा नसतो, तर ती जम्खम बरी करून पुन्हा जोमाने कामाला लागायचे असते. माझ्या पराभवामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास  ढळला असेल. यामुळे पराभव विसरून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे,  असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी रविवारी आंबा(ता. शाहूवाडी) येथे झालेल्या कार्यकर्ता अभ्यास शिबिरात केले. मी पराभवाच्या दु:खाला कवटाळून बसलो असलो तर देशातील शेतकरी आभाळाकडे आशाळभूत नजरेने बघत हतबल झाला असता असे शेट्टी यांनी सांगितले.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांचे लोकसभा निवडणुकीतील आढावा अभ्यास शिबिर आयोजित केले होते. लोकसभा निवडणुकीत पक्षाला आलेले अपयश, त्याची कारणमीमांसा व विचारमंथन, केंद्र व राज्य सरकारचे शेतकरी विरोधी धोरण, त्याचे परिणाम, आगामी विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानीची भूमिका,आंदोलनाची दिशा या विविध विषयावर चर्चा झाली.

या वेळी शेट्टी म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर मी राज्यामध्ये जवळपास २ हजार किलोमीटरचा दुष्काळ दौरा केला. शेती क्षेत्राकडे सरकारने दुर्लक्षित केल्याने व राज्यातील शेतकऱ्यांसमोरील संकटे वाढल्यामुळे दिवसेंदिवस आत्महत्यांचे  प्रमाण वाढत आहे. यामुळे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांंनी चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न हातात घेऊ न त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन त्यांनी केले.