युवक काँग्रेस मेळाव्याला भरभरून कार्यकर्ते आणल्याचा दावा करणा-या तालुका युवक अध्यक्षांचा पर्दाफाश भर मेळाव्यात युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अमिरदर सिंग राजा ब्रार यांनी शुक्रवारी येथे केला. तसेच काँग्रेस वाढवायची असेल तर प्रामाणिकपणे काम करण्याचा सल्ला देत कानउघडणीही केली.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे येथे आयोजित युवक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष विश्वजित कदम, महाराष्ट्राचे महासचिव हिंमत सिंग, आमदार सतेज पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, जिल्हा सरचिटणीस रुपाली पाटील आदी उपस्थित होते.
या मेळाव्याला फारच अल्प प्रतिसाद मिळाला. या वेळी युवक काँग्रेसच्या या राष्ट्रीय अध्यक्षांनी प्रत्येक तालुकाध्यक्षांना किती कार्यकर्ते आणल्याची विचारणा केली. यावर प्रत्येक अध्यक्षाने मोठमोठे आकडे सांगितले. परंतु प्रत्यक्षात समोर उपस्थिती कमी असल्याने त्यावरून त्यांनी या पदाधिकाऱ्यांना फैलावर घेतले. पक्ष वाढवायचा असेल तर अगोदर प्रामाणिकपणे काम करण्यास त्यांनी सुनावले. दरम्यान या वेळी त्यांनी देशात भाजपचे सरकार असले तरी त्यापाठीमागचा विचार हा ‘आरएसएस’चा असल्याचे सांगत सरकारवर टीकाही केली.