दयानंद लिपारे वाढत्या करोना संसर्गामुळे राज्यात कडक निर्बंध जाहीर झाल्याने परप्रांतीय कामगारांनी मोठ्या संख्येने मूळ गावची वाट पकडली आहे. राज्यातील वस्त्रोद्योगाला याचा मोठा फटका बसला असून या कामगारांअभावी हा उद्योगच अडचणीत आला आहे. मार्च महिन्यापासून राज्यात करोनाचे रुग्ण पुन्हा मोठ्या प्रमाणात सापडू लागले आहेत. एप्रिल उजाडेपर्यंत परिस्थिती आणखीच गंभीर बनल्याने नुकतेच राज्यात सर्वत्र कडक निर्बंध जाहीर केले आहेत. वाढता करोना आणि या कडक निर्बंधामुळे राज्यातील परप्रांतीय कामगार सर्वाधिक हवालदिल झाले असून त्यांनी पुन्हा एकदा मूळ गावची वाट पकडली आहे. यामागे करोनाची भीती जेवढी आहे, त्यापेक्षा टाळेबंदी झाल्यास कामाशिवाय अडकून पडण्याची धास्ती अधिक आहे. या परप्रांतीय कामगारांमध्ये सर्वाधिक कामगार हे वस्त्रोद्योगातील आहेत. राज्यातील इचलकरंजी, भिवंडी, मालेगाव, नागपूर, विटा, सोलापूर आदी वस्त्रोद्योगातील हजारो परप्रांतीय कामगारांनी गेल्या दहा दिवसांत आपल्या मूळ गावची वाट पकडली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, पश्चिाम बंगाल, झारखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यातील हे कामगार आहेत. गावी परतण्यासाठी रेल्वे, रस्ते मार्गे सोय आहे तोच परतण्यावर या कामगारांचा भर आहे. मागील वर्षी टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर गावी परतण्यास पडलेले कष्ट आणि हालअपेष्टा लक्षात घेत या कामगारांनी वेळीच गाव गाठण्यास प्राधान्य दिले आहे. करोनाच्या पहिल्या लाटेनंतर वस्त्रोद्योगाची चक्रे नुकतीच पुन्हा फिरू लागली होती. कामगार परतल्याने सूतगिरणी, सायझिंग, प्रोसेस, गारमेंट या प्रत्येक क्षेत्रातील व्यवहारही वाढीस लागले होते. सूत दरवाढीच्या अडचणीतही हा उद्योग पुन्हा जोर पकडू लागला होता. उद्योग बंद राहण्यापेक्षा किमान कर्ज, व्याज, कारखाना भाडे, अन्य देणी, उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला याचाच आनंद यंत्रमागधारक, वस्त्रोद्योजकांना होता. पुन्हा रोजगार उपलब्ध झाल्याने कामगारांचे चेहरेही आनंदाने फुलले होते. अशा रीतीने गाडे रुळावर येत असतानाच या दुसऱ्या लाटेने या वस्त्रोद्योगाची घडी पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. उत्पादनावर परिणाम करोनाच्या पहिल्या लाटेत झालेले नुकसान सहन करत हा उद्योग पुन्हा एकदा स्थिरावत असतानाच हे नवे संकट उभे राहिल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. वस्त्रोद्योगातील हजारो कामगार जन्मगावी जात आहेत. यामुळे कुशल कामगारांची टंचाई जाणवू लागली आहे. याचा उत्पादन निर्मितीवर परिणाम झाला असून उत्पादनात घट होत आहे. - अशोक स्वामी , अध्यक्ष, राज्य वस्त्रोद्योग महासंघ