कोल्हापूर येथे आज (सोमवार) पहाटे पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पाच विद्यार्थी ठार झाले असून २५ जण जखमी झाले आहेत. हे सर्व विद्यार्थी सांगलीतील असल्याचे सांगण्यात येते. अरुण अंबादास बोंडे (वय २२), केतन प्रदीप खोचे (वय २१), प्रवीण शांताराम त्रिलोटकर (वय २३) सुमित संजय कुलकर्णी (वय २३), सुशांत विजय पाटील (वय २२) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाजवळील नागाव येथील आंबेडकर नगर येथे आज पहाटे साडेचारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. हे विद्यार्थी सांगलीतील वालचंद महाविद्यालयातील असल्याचे सांगण्यात येते. शिवजयंतीनिमित्त हे सर्वजण पन्हाळ्याहून सांगलीला शिवज्योत घेऊन जात होते. त्यासाठी त्यांनी ट्रक केला होता. ट्रकमध्ये सुमारे ३० विद्यार्थी होते. सांगलीला जात असताना समोरून आलेल्या दुचाकीला चुकवताना हा अपघात झाला. या अपघातात महामार्गावरील पुलावरच ट्रक उलटला होता. ट्रकखाली दबल्या गेल्याने पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. परिसरातील गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. जखमींवर उपचार सुरू असून काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Truck accident at kolhapur 5 sanglis student died 25 injured
First published on: 19-02-2018 at 07:37 IST