कोल्हापूर जिल्ह्यातील पुणे-बंगळुरू महामार्गावर सोमवारी झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. येथील तवंदी घाटाच्या परिसरातील हिटणी गावाजवळ दुपारी एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातात अॅडव्होकेट जावेद मुल्ला (वय.४७, रा. टेंबलाईवाडी, कोल्हापूर), अॅडव्होकेट देवानंद वाघमारे (रा. कोल्हापूर) आणि त्यांचे अशील चंद्रकांत श्रीपती पाटील (पन्हाळा) यांचा जागीच मृत्यू झाला. हे तिघे जण न्यायायलयाचे काम आटपून गाडीने आजऱ्याहून कोल्हापूरच्या दिशेने येत होते. अॅडव्होकेट जावेद मुल्ला हे गाडी चालवत होते. मात्र, हिटणी गावाजवळ असताना त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्यांची गाडी रस्त्यालगत असणाऱ्या कमानीला जाऊन धडकली. यामध्ये मुल्ला, वाघमारे आणि पाटील (पन्हाळा) यांचा मृत्यू झाला. मुल्ला हे कोल्हापूर जिल्हा न्यायालयात फौजदारी वकील म्हणून काम करत होते.