लिखाण करणे सोपे नाही यासाठी अंगात सृजनशिलता असणे गरजेचे आहे. नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्याकडील हे गुण जयश्री दानवे यांनी जोपासले असून त्यांचे लिखाण मराठी साहित्यामध्ये भर टाकणारे आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक श्याम भुर्के यांनी व्यक्त केले.
करवीर नगर वाचन मंदिर येथे जयश्री जयशंकर दानवे लिखीत अमर्त्य (व्यक्तिचित्र) आणि अभिरुची (कथासंग्रह) पुस्तकांचे प्रकाशन श्याम भुर्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जयश्री दानवे, राजदर्शन दानवे, सुधीर पेटकर, जीवन जोशी उपस्थित होते.
श्री. भुर्के म्हणाले, आज मराठी साहित्यामध्ये दोन पुस्तकांचा जन्म झाला आहे. कोल्हापूरमध्ये अनेक कलाकार झाले आहेत. जयशंकर दानवे हे यापकी एक आहेत. अमर्त्य व अभिरुची या पुस्तकांमुळे महापुरुषांचे चरित्र पुढच्या पिढीला समजण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त केले.
जयश्री दानवे म्हणाल्या, भारतामध्ये अनेक महापुरुष झाले आहेत. अशा महापुरुषांचे विचार समाजाला प्रेरणादायी ठरत असतात. त्यांचे हे विचार आपल्यात राहावे यासाठी अमर्त्य व अभिरुची या पुस्तकांचे लिखाण केले आहे. पुढील पिढीला या महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा मिळणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले, तर राजदर्शन दानवे यांनी आभार मानले. यावेळी नागरिक उपस्थित होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 11, 2016 1:58 am