कोल्हापुरातील ताबूत विसर्जन मिरवणुकीत केएमटी बस घुसल्याने २ जण ठार तर १९ जण जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे. रात्री ८ च्या सुमारास हा अपघात झाला. कोल्हापुरातील पापाची तिकटी या ठिकाणाहून मिरवणूक जात होती त्याचवेळी हा अपघात झाला. संतप्त जमावाने केएमटीवर हल्ला चढवला. त्यानंतर वातावरण तणावाचे झाले.

बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या बसखाली पडून २ जण ठार तर १९ जण गंभीर जखमी झाल्याचे समजते आहे. मोहरम असल्यामुळे ताबूत विसर्जनाची मिरवणूक निघाली होती. वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक पंचगंगा नदीकडे निघाली. त्याचवेळी शिवाजी चौकातून गंगावेश कडे निघालेल्या केएमटी बसचे ब्रेक निकामी झाले. ही बस या मिरवणुकीत घुसली.

या अपघातानंतर शहरातील तणाव वाढला आहे. ३ हजार लोकांचा जमाव घटनास्थळी आहे. यावेळी आलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीचीही काच संतप्त जमावाने फोडली. या ठिकाणी शिघ्र कृती दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

मृतांची नावे

तानाजी भाऊ साठे, सुजल भानुदास अवघडे

जखमींची नावे

आनंदा राऊत, पृथ्वीराज सहारे, बाळकृष्ण हेगडे, स्वप्नील साठे, विनोद पाटील, आकाश साठे, सचिन साठे, साहिल घाडगे, संदीप साठे, प्रथमेश भंडारे, अनुराग भंडारे,सुनीत पालके, कमल तिकडे, करण साठे, योगेश कवाळे, अमर कवाळे, कुणाल साठे, सनी घारदे, दत्ता केरबा साठे

या अपघातात एकूण २ जण ठार तर १९ जण जखमी झाले आहेत. जखमी रूग्णांवर रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.