शेतकरी अडचणीत असताना क्रिकेटवर चर्चा केल्याचा आरोप

राज्यातील शेतकरी अडचणीत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गाठीभेटी घेत आहेत. या बठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी मुंबई क्रिकेट मंडळाचे भले कसे होईल याचा विचार केला जात आहे. अशांना ‘शेतकऱ्यांचे कैवारी’ कसे म्हणावे, अशी टीका शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली.

ठाकरे हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. नेसरी येथील सभेत ठाकरे यांनी शासनाच्या शेतकरी धोरणांवर फटकारे ओढले. ठाकरे म्हणाले, की सध्या शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी सौभाग्य योजना आणली. एकही पसे न घेता वीज पुरवठा करणार होते. पण, एकीकडे वीज द्यायची आणि दुसरीकडे ती कापायची असा प्रकार सुरू आहे. राज्यातील शेतकरी त्रासला आहे, तरीही तो सोने पिकवतो. तो या मातीचा राजा आहे. त्याला तुमचे उपकार नकोत तर शेतमालाला हमीभाव पाहिजे. पण हे सरकार त्याला त्याच्या घामाचे मोल देत नसल्याची टीका त्यांनी केली.

कोल्हापूरचे एक ‘पार्सल’ मंत्रिमंडळात आहे, अशा शब्दात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यांनी खिल्ली उडवली. ‘निम्मे डांबर वापरून रस्ते करा’, ‘रस्त्यावर खड्डे पडले तर आभाळ कोसळत नाही’ असे म्हणणारे ते कोण आहेत, अशी विचारणा त्यांनी केल्यावर शिवसनिकांनी ‘चंदूमामा’ असा गलका केला. त्यावर ठाकरे यांनी ‘त्यांनी तुम्हाला मामा बनवले आहे’, असे म्हणत मंत्री पाटील यांच्यावर शेरेबाजी केली. पाटलांच्या मंत्रिपदाचा कसलाच उपयोग या जिल्ह्य़ाला झाला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

शेतकरी तुरुंगात अन् मल्ल्याची चैन

कृषी कर्जमाफी अर्जात अनवधानाने चूक केली तर शेतकरी तुरुंगात जाणार आहे. पण मल्ल्यासारखे कोटय़वधीचे कर्जचुकवे गर्भश्रीमंत विदेशात मजा मारत आहेत. एक तर शेतकऱ्याला गावामध्ये धड शिकू देत नाही आणि चूक झाली की तुरुंगवारी करायला लावताय. हे असले सरकार आपले असू शकत नाही, असा टोला त्यांनी लगावला. राज्यात सत्ता आल्यावर बेळगावही महाराष्ट्रात आणण्यात येईल असेही ते या वेळी म्हणाले.